ठाणे : रेल्वे प्रवासादरम्यान लोकल आणि फलाट यांमधील गॅप कमी करण्यासाठी दिवा, डोंबिवली व ठाकुर्ली या स्थानकांमध्ये लाखो रुपयांचे कंत्राट देऊन पेव्हरब्लॉक बसविले होते. ही कामे पूर्ण येऊन वर्ष-दीड वर्ष होत नाही तोच अनेक ठिकाणी लोकल व फलाटांमधील अंतर वाढले आहे. दिवा स्थानकात तर पेव्हरब्लॉकसह फरश्या निघाल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. फलाटाच्या कॉर्नरवर लावलेल्या फरश्याही निघाल्या आहेत. या स्थानकातील फलाट क्रमांक १ वरील कल्याण दिशेकडील पेव्हरब्लॉक निघाले असल्याने या ठिकाणाहून वाट काढताना प्रवाशांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे. याच फलाटातील मुंबई दिशेकडील भागातील स्वच्छतागृहासमोरील ठिकाणीही अशाच प्रकारे पेव्हर ब्लॉक व फरश्या उखडल्या आहेत. स्थानकातील बेंचेसची संख्या अपूर्ण असल्याने पत्र्यांमधून वाहणारे पाणी जेथून खाली सोडले जाते त्या ठिकाणच्या पाइपलाइनजवळील चौथर्याच्या ठिकाणी अनेक प्रवासी बसतात. त्या ठिकाणीही पेव्हरब्लॉक खचले आहेत. लोकलमध्ये चढताना फलाटाच्या कॉर्नरवर असलेल्या फरश्याही निघाल्या असल्याने येथून अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल अॅड. भगत यांनी केला आहे. फरश्यांसंदर्भात स्थानक प्रबंधक एस. पात्राव यांनीही मध्य रेल्वेच्या वरिष्ठांशी चर्चा केल्याचे ते म्हणाले. स्थानकात थंड पिण्याच्या पाण्याचा अभाव, कोकणातील गाड्या जाणार्या फलाटांवरील समस्यांसह स्वच्छतागृहांची अपुरी संख्या, फलाट क्रमांक ३ वरील अर्धवट छत, भिकार्यांसह गर्दुल्ले, दिव्यांची कमतरता, उद्घोषणा यंत्रांची समस्या, रात्रीच्या वेळी मार्गदर्शक असलेले अन्य फलाटांमधील इंडिकेटर्स आदी असुविधांबाबतही तोडगा निघालेला नाही. त्यातच आहे त्या सुविधाही चांगल्या नसल्याने या स्थानकाला वाली कोण, असे प्रवासी विचारत आहेत. (प्रतिनिधी)
फरश्या, पेव्हरब्लॉक खचले
By admin | Updated: May 19, 2014 05:12 IST