मुंबई : लहान मुलांच्या अपहरणाचे गुन्हे प्राधान्याने व गांभीर्याने हाताळा, असे आदेश आज पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी तमाम पोलीस ठाण्यांना दिले. ‘लोकमत’ने लहान मुलांच्या अपहरणांचे वाढलेले गुन्हे, ते रोखण्यासाठी पालकांची भुमिका याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.मारिया यांनी उपायुक्त, अप्पर आयुक्तांची बैठक बोलावली होती. त्यात गुन्ह्यांची उकल, दोषसिद्धी दर वाढविण्यासाठी उपाय अशा विविध विषयांवर चर्चा केली. त्यात लहान मुलांचे अपहरण, अपहरणानंतर होणारे लैंगिक अत्याचार या गुन्हयांबाबत आयुक्तांनी विस्तृत चर्चा केली. शहरातून दरवर्षी तीन ते चार हजार मुले गायब होत आहे. मुले हरविणे, अपहरण होणे ही एक गंभीर बाब असून मुलांच्या शोधासाठी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये विशेष मोहीम हाती घेत, हरविलेल्या मुलांचा शोध घेतल्यास ५ हजार रुपये आणि मुले चोरणारी किवा अपहरण करणारी टोळी पकडल्यास १० हजार रुपये रोख बक्षिस जाहीर केले होते. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक नेमून या मुलांचा शोध घेण्यात येत होता. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा उपक्रम पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला, अशी माहिती पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी लोकमतला दिली. २००५ ते २०१४ या काळात ३४ हजार ७८७ मुले हरवली, अपहृत झाली. त्यापैकी ३३ हजार ३८३ मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले. यावर्षी २३ मार्च पर्यंत ३५१ मुले आणि मुली हरविल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी ३१८ जणांचा शोध घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत एकूण १४४७ मुले सापडलेली नाहीत. त्यांचा शोध घेण्याचे आदेश मारिया यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
हरविलेल्या, अपहृत मुलांना शोधा
By admin | Updated: March 26, 2015 01:57 IST