Join us

अखेर पालकमंत्र्यांना आली जाग

By admin | Updated: July 15, 2014 00:41 IST

ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनचे काम धीम्या गतीने सुरू आहे. रखडलेल्या कामाविषयी चौफेर टीका होऊ लागली आहे

नवी मुंबई : ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनचे काम धीम्या गतीने सुरू आहे. रखडलेल्या कामाविषयी चौफेर टीका होऊ लागली आहे. अखेर पालकमंत्र्यांनाही याची दखल घ्यावी लागली असून त्यांनी मंगळवारी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने पामबीच रोडवर नवीन मुख्यालय व ऐरोली सेक्टर १५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले होते. यामधील मुख्यालयाच्या कामास प्रशासनाने प्रथम प्राधान्य दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. परंतु दुसरीकडे एप्रिल २०११ ला सुरू झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या कामाकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. सदर काम एप्रिल २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप मोठ्याप्रमाणात काम बाकी आहे. भवनमध्ये डोम उभारण्याचे कामही पूर्ण होवू शकलेले नाही. यामुळे विरोधी पक्षांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने डिसेंबर २०१३ मध्ये ८ महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते. परंतु ते पूर्ण करता आले नाही. आंबेडकर भवनविषयी टीका होवू लागल्यामुळे अखेर पालकमंत्री गणेश नाईक यांनाही जाग आली आहे. भवनच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले आहे. तीन वर्षात कामाची गती वाढविण्यास पुरेसा प्रयत्न झाला नाही. आताच्या दौऱ्यात पालकमंत्री नक्की काय भूमिका घेणार, सदर कामास गती मिळणार की हा दौरा फक्त औपचारिकतेसाठी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.