नामदेव मोरे - नवी मुंबईलोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवी मुंबई राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. घराणेशाहीचा शिक्काही पुसण्याचा प्रयत्न केला जात असून महापौर, स्थायी समिती सभापती व जिल्हा अध्यक्षांच्या निवडीमधून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँगे्रस म्हणजे गणेश नाईक असे समीकरण आहे. दोन वर्षांपूर्वी शहरात नाईक परिवाराव्यतिरिक्त आमदार शशिकांत शिंदे, मंदा म्हात्रे, नरेंद्र पाटील हे पक्षाचे नेतेही शहरात वास्तव्यास होते. परंतु निर्णय प्रक्रियेमध्ये यांचा काहीही सहभाग नव्हता. नाईक म्हणतील त्यालाच पद असे समीकरण होते. २० वर्षे महापालिकेत सत्ता असताना १२ वर्षे नाईक परिवारातील सदस्यच महापौर झाले. २००५ ते २०१० दरम्यान महापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्यामुळे संदीप नाईक यांना महापौर होता आले नाही. परंतु पाचही वर्षे स्थायी समिती सदस्य व त्यामधील तीन वर्षे सभापतीपद भूषवून महापालिकेवर स्वत:ची पकड निर्माण केली होती. मंत्री, दोन आमदार, खासदार, महापौर ही सर्व सत्तास्थाने एकाच घरात असल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष म्हणजे नाईक असे बोलले जाऊ लागले. गोपीनाथ ठाकूर हे अनेक वर्षे जिल्हा अध्यक्ष होते. परंतु हे पद फक्त नावाला होते. सत्तेच्या केंद्रीकरणामुळे राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा आरोप होऊन लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. महापालिकेमधील सत्ताही राष्ट्रवादीच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी प्रसंगावधान राखून नाईक परिवारातील एकही सदस्य निवडणूक लढणार नसल्याचे घोषित करून टाकले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला व निवडणुकीत घराणेशाहीचा आरोप करण्याचे विरोधकांचे मनसुबे उधळले. सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतर अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याऐवजी काँगे्रसला सोबत घेतले. यामुळे काँगे्रसकडून सातत्याने होणारी टीका पुढील पाच वर्षे थांबली आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सुधाकर सोनावणे यांना महापौर केल्यामुळे सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. नेत्रा शिर्के यांना ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांमध्ये पहिल्यांदाच महिलेला स्थायी समिती सभापती होण्याचा बहुमान मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षपदी अनंत सुतार यांची नियुक्ती केली आहे. सुतार यांनी आतापर्यंत नगरसेवक ते स्थायी समिती सभापतीपदापर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. चांगले वक्तृत्व व संघटन कौशल्य असल्यामुळे सुतार पक्ष बळकटीस महत्त्वाची भूमिका बजावतील असे मत पक्षातील पदाधिकारीही व्यक्त करत आहेत.च्पराभवातून राष्ट्रवादीने चांगलाच धडा घेतला आहे. नाईक केंद्रित कारभाराला बगल देण्यात आली आहे. यामुळे विरोधकांकडून होणारे घराणेशाहीचे आरोप थांबले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोपही थांबले आहेत.च्जिल्हा अध्यक्ष फक्त सह्याजीराव असल्याची टीकाही बंद झाली असून राष्ट्रवादीने विरोधकांच्या शिडातील हवाच काढूून टाकली आहे. मागील पाच वर्षांत काँगे्रसने सातत्याने टीका व आरोप केले होते. आता तेच सत्तेत असल्यामुळे आरोपांची धार कमी होणार आहे.
अखेर राष्ट्रवादीत अवतरली लोकशाही
By admin | Updated: May 31, 2015 00:53 IST