पालघर : सफाळेजवळील वाढीव बेटाच्या संरक्षण बंधाऱ्याजवळ बेकायदेशीररीत्या रेती उत्खनन होत असल्याच्या तक्रारीनंतर तहसीलदारांच्या आदेशाने गुरुवारी कारवाईसाठी गेलेल्या सर्कल, तलाठी व पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. धाड टाकली जाणार असल्याची खबर दुसऱ्याच मिनिटाला रेतीधारकांना लागल्यामुळे एकही बोट रेती उत्खननासाठी आली नाही. त्यामुळे महसूल, पोलीस व रेतीवाले यांची अभद्र युती किती घट्ट आहे, हे सत्य पुन्हा एकदा सर्वांसमोर उघड झाले आहे.पालघर तालुक्यातील सफाळे व वैतरणा रेल्वे स्टेशनच्या दरम्यान पूर्वेकडील वैतरणा खाडीमध्ये वाढीव बेट वसले असून या बेटावर सुमारे अडीच हजार लोक राहतात. हे नागरिक अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सेवा, पाणी आदी मूलभूत सोयीसुविधा मिळविण्यासाठी जीवघेणा संघर्ष करीत आहेत. या बेटाच्या सभोवताली असणाऱ्या खाडीमध्ये चांगल्या प्रतीची रेती मिळत असल्याने ती ओरबडून घेण्याच्या नादात वाढीच बेटाचा संरक्षण बंधारा फुटून उधाणाचे पाणी गावात शिरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात सर्वात मोठी भरती येणार असल्याने या गावातील नागरिक भयग्रस्त झाले आहेत.वाढीव बेटाच्या संरक्षण बंधाऱ्यालगत रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी वाढीव ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रसेन पवारांची भेट घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर, तहसीलदाराने तत्काळ सर्कल नरुटे, तलाठी एस.बी. पवार, अहिरे, किरण जोगदंड यांच्यासह केळवा पोलिसांना या रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, काही क्षणांतच धाड पडणार आहे, ही खबर रेती उत्खनन करणाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने कर्मचारी रिकाम्या हाताने परत आले. (वार्ताहर)
रेतीउत्खननावरील धाडीचा सफाळ््यात ‘फियास्को’
By admin | Updated: June 6, 2015 23:20 IST