डहाणू : डहाणूच्या शहरी, ग्रामीण भागातील २५ गावांमध्ये वीज तारा लोंबकळत असून या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र या तारा बदलविण्याकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केले आहे. सोमवारी वीज तारांचा स्पर्श होऊन एकाला आपला जीव गमवावा लागल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागातील पंचवीस ते तीस गावांत तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पूर्वेकडील जंगलपट्टी भागात वीज तारा लोंबकळत आहे. हातात पकडता येईल एवढ्या कमी उंचीवर या तारा आहे. चिंचणी, वरोर, वाढवण, तनासी, ओसार, धा. डहाणू, वानगांव, तडियाळे, गुंगवाडा, बाडापोखरण, पोखरण आदी समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या गावांत दररोज वीज तारा तुटण्याच्या घटना घडत आहे. पन्नास वर्षापूर्वी वीज तारा लावण्यात आल्या त्या अद्यापही बदलविण्यात आल्या नाही. त्यामुळे अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. मागीलवर्षी डहाणूच्या सावटा येथे वीज ताराला स्पर्श होऊन सुजल धर्मेश युथा(७) या बालकाचा मृत्यू झाला होता. मागील काही वर्षांमध्ये अनेक घटना घडल्या आहेत. तारा बदलविण्यासंदर्भात अनेकवेळा ग्रामस्थांनी निवेदन दिले, मात्र महावितरण याकडे लक्ष द्यायला तयार नाही. (वार्ताहर)
लोंबणाऱ्या वीज तारांमुळे भीतीचे वातावरण
By admin | Updated: June 16, 2015 23:12 IST