Join us

एफसीएफएस फेरी होणार ७ टप्प्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:13 IST

३० जानेवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने होणार प्रवेश : उद्यापासून प्रक्रियेला सुरुवातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या ३ नियमित ...

३० जानेवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने होणार प्रवेश : उद्यापासून प्रक्रियेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या ३ नियमित व २ विशेष फेऱ्यांमध्ये आतापर्यंत मुंबई विभागातून १ लाख ९६ हजार १३६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तरीही अद्याप अनेक विद्यार्थी प्रवेशाविना असून १ लाखाहून अधिक प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (एफसीएफएस) फेरीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही फेरी ७ टप्प्यांत पार पाडली जाणार असून, अकरावी प्रवेशाची ही अंतिम फेरी असेल. १३ जानेवारीपासून या प्रक्रियेला सुरुवात हाेईल.

संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रवेश घ्यायचा असलेले कनिष्ठ महाविद्यालय, रिक्त जागांची माहिती, तेथील कट ऑफ या सर्वांची माहिती आधीच घेणे आवश्यक असणार आहे. या फेरीदरम्यान एखादे महाविद्यालय विद्यार्थ्यांनी चुकून निवडले असल्यास आणि तेथे त्याला प्रवेश घ्यायचा नसल्यास तो ते रद्द करून दुसरे महाविद्यालय निवडू शकणार आहे. अशी सुविधा देण्यात आली आहे. जे विद्यार्थी अद्यापही प्रक्रियेमध्ये समाविष्ट नाहीत त्यांनी संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालय व शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

असे असणार एफसीएफएस फेरीचे टप्पे

१) ९०% ते १००% दरम्यान गुण प्राप्त असलेले विद्यार्थी १३ ते १५ जानेवारीदरम्यान प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकतील.

२) ८०% ते १००% दरम्यान गुण प्राप्त विद्यार्थी १६ ते १८ जानेवारीदरम्यान प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकतील.

३) ७०% ते १००% दरम्यान गुण प्राप्त विद्यार्थी १९ ते २० जानेवारीदरम्यान प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकतील.

४) ६०% ते १०० % दरम्यान गुण प्राप्त विद्यार्थी २१ जानेवारी ते २२ जानेवारीदरम्यान प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकतील.

५) ५०% ते १००% दरम्यान गुण प्राप्त विद्यार्थी २३ ते २५ जानेवारीदरम्यान प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकतील.

६) दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी २७ ते २८ जानेवारीदरम्यान प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकतील.

७) दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थी, राज्य मंडळाचे सर्व एटीकेटी सवलतीधारक विद्यार्थी २९ ते ३० जानेवारीदरम्यान प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकतील.

............................................