Join us  

म्हाडाच्या सभापतींवर उपोषणाची पाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:26 PM

मुंबई म्हाडाच्या अंतर्गत येणाऱ्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामात अक्षम्य दिरंगाई आढळून आल्यानंतर  म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांना मुंबई म्हाडाचे सभापती मधु चव्हाण यांनी आपल्या दालनात बोलावून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत खडे बोल सुनावले.

ठळक मुद्देतुम्ही लोकांची कामे गांभीर्याने घेत नसाल तर म्हाडाच्या कार्यालयात मलाच उपोषणाला बसावे लागेल.मधु चव्हाण यांनी मुंबई म्हाडाचे उपमुख्य अभियंता, निवासी कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केलीसभापती हा शोभेचा नाही तर लोकांची कामे करण्यासाठी त्यांना सरकारने बसविले आहे.

मुंबई  - मुंबईम्हाडाच्या अंतर्गत येणाऱ्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामात अक्षम्य दिरंगाई आढळून आल्यानंतर म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांना मुंबई म्हाडाचे सभापती मधु चव्हाण यांनी आपल्या दालनात बोलावून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत खडे बोल सुनावले. "तुम्ही लोकांची कामे गांभीर्याने घेत नसाल तर म्हाडाच्या कार्यालयात मलाच उपोषणाला बसावे लागेल", असा  इशारा त्यांनी आज दिला. यासंदर्भात चव्हाण यांनी मुंबई म्हाडाचे उपमुख्य अभियंता, निवासी कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. 

मधु चव्हाण यांनी मुंबई मंडळ अंतर्गत म्हाडा वसाहतीतील हाती घेण्यात आलेल्या पुनर्विकासाच्या प्रगतीबाबतची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून ६ ऑक्टोबर २०१८ यादिवशी पत्र पाठविले होते. त्यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यक यांनीही २० ऑक्टोबर २०१८ रोजी स्मरणपत्र लिहूनही माहिती पाठविण्यात आली नसल्याने चव्हाण यांनी काही आधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात बोलावून सुनावले. "सभापती हा शोभेचा नाही तर लोकांची कामे करण्यासाठी त्यांना सरकारने बसविले आहे". इमारत पुनर्विकासाशी संबंधित रहिवाशांना शासन म्हणून आम्ही जनतेला वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही. विकसितकार व सहकारी संस्था 'ना हरकत प्रमाणपत्र' किंवा 'देकार पत्र' घेतात आणि जनता  आपल्या इमारतीच्या पुनर्विकासाची वर्षानुवर्षे वाट पहात बसली आहे,  ही बाब अतिशय गंभीर असल्याचे मधु चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात मधु चव्हाण म्हणतात "भाडेकरूंना मदत करण्याच्या दृष्टीने माहिती मी मागवली होती. मला वाटते की, हे आपण सहजपणे घेतलेले आहे. माहिती वेळेवर देता येत नसेल तर माहिती मिळण्यास आपणास वेळ लागत असेलही हे मान्य आहे, परंतु जर वेळ लागत असेल तर त्याची कारणे नमूद करणारे छोट्या टिपणीद्वारे आपण माझ्याकडे उत्तर पाठवू शकत होता. तेही आपण केलेले नाही, ही तर अतिशय गंभीर बाब आहे. सभापती कार्यालयातून पाठविलेल्या पत्रांना जर महिना महिना योग्य प्रतिसाद मिळत नसेल तर जनतेच्या पत्रांना आपण वेळीच उत्तरे देता कसे याबाबत साशंक आहे". 

टॅग्स :म्हाडामुंबई