मुंबई : व्यवसाय शिक्षण मंडळाच्या बंद झालेल्या संस्था पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण संस्था परिषदेने शुक्रवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकारने संस्था सुरू ठेवण्यासाठी घातलेल्या कडक नियमांमुळे संस्था बंद झाल्याचा आरोप परिषदेचे कार्याध्यक्ष राहुलदेव मनवर यांनी केला आहे.मनवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाच्या संस्थांवर जाचक अटी लादल्याने हजारो संस्था बंद पडल्या आहेत. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सरकारची दिशाभूल केल्याने हा प्रकार घडल्याचा मनवर यांचा आरोप आहे. संस्था बंद झाल्याने लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, हजारो संस्थाचालकांची गुंतवणूकही धूळखात पडल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री रणजीत पाटील यांना सर्व कागदपत्रांसह निवेदन दिलेले आहे.मंडळाच्या विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी शिष्यवृत्त्या सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. शिवाय शिक्षण शुल्कासाठी केंद्राकडून मिळणारा निधी वापराअभावी परत जात आहे. त्यामुळे त्याची तरतूद करण्याची त्यांची मागणी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कडक नियम आणि अटी तत्काळ शिथिल केल्या नाही, तर येत्या काळात अनेक संस्था पडण्याची भीतीही मनवर यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
व्यवसाय शिक्षण संस्थांसाठी उपोषण
By admin | Updated: November 23, 2015 01:50 IST