नवी मुंबई : शहरात अनेक ठिकाणी रोडवरील गटारांची झाकणे तुटली आहेत. महापालिका प्रशासन झाकणे बसविण्याकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळापूर्व कामे पूर्ण होत आली असल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. दुसरीकडे शहरात अनेक समस्या जैसे थे असल्याचे चित्र पहावसाय मिळत आहे. शहरात काही ठिकाणी गटारावर रोड तयार करण्यात आला आहे. काही ठिकाणी एमएसईबी,एमटीएनएल व इतर मोबाइल कंपन्यांच्या केबल गेल्या आहेत. यासाठी अनेक ठिकाणी चेंबर तयार केले आहेत. गटारावरील व चेंबरवरील झाकणे काही ठिकाणी तुटली आहेत. पामबीच रोडवरून आगरी कोळी भवनकडे वळण घेणाऱ्या रोडवर आठ दिवसांपासून गटारावरील झाकण तुटले आहे. वाहनधारकांना माहिती व्हावी यासाठी नागरिकांनी वृक्षाची फांदी या खड्ड्यात टाकून ठेवली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याविषयी तक्रार केली असून अद्याप झाकण बसविण्यात आलेले नाही. नेरूळ सेक्टर २० मधील तलावाच्या बाजूलाही १५ दिवसांपासून गटारावरील झाकण तुटले असून येथेही वृक्षाची फांदी टाकली आहे. वेगाने येणारी वाहने या गटारात जाऊन अपघाताची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. परंतु दोनही ठिकाणी दुरुस्ती होत नसून पालिकेच्या निष्काळजीपणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
खड्ड्यांकडे पालिकेची डोळेझाक
By admin | Updated: June 3, 2015 04:05 IST