लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या संशयित अतिरेक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. रेल्वेस्थानक व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे, तसेच कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.
मुंबईसह प्रमुख शहरांतील रेल्वेस्टेशन, बसस्थानक, मॉल्सच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, श्वानपथकाद्वारे परिसराची पाहणी केली जात आहे. दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक करून संभाव्य घातपाती कट उघडकीस आणला आहे. या कटामध्ये मुंबईतील एकाचा समावेश असल्याने राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. गणेशोत्सव असल्याने पोलिसांनी महत्त्वाची, अतिमहत्त्वाची ठिकाणे, रेल्वे, बसस्थानके या सार्वजनिक ठिकाणी विशेष दक्षता बाळगावी, असे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुंबईचे आयुक्त हेमंत नागराळे यांनी दिले आहेत. त्यानुसार ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.