राजू काळे, भार्इंदर _ एमआयडीसीच्या (महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ) कोट्यातून मंजूर केलेले अतिरिक्त २० दशलक्ष लीटर पाणी शहरात आणण्यासाठी टाकण्यात येणार्या जलवाहिनीचे काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून, पाणी जून महिन्यात मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक आ. मुझफ्फर हुसेन यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शहराला एमआयडीसी कोट्यातून २० दशलक्ष लीटर पाणी २०११ मध्ये मंजूर केले. परंतु ते आणण्यासाठी एमआयडीसीने तांत्रिक मुद्दा उपस्थित करून त्यावर मुंबईच्या आयआयटी (भारतीय प्राद्योगिक संस्था) कडून पाहणी करण्याचा सल्ला दिला. यामुळे मंजूर अतिरिक्त पाणी तांत्रिक अडचणीत सापडून ते मिळण्यात अडसर निर्माण झाला होता. त्यातच पाण्याच्या स्रोतापासून ते शहरादरम्यानच्या मार्गावर संजय गांधी राष्टÑीय उद्यानाचा बहुतांशी भाग येत असल्याने नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक ठरल्याने त्यात बराच कालावधी गेला. प्रशासनाने त्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू करून अखेर आयआयटीचा सकारात्मक अहवाल एमआयडीसीला सादर करून वन विभागाची परवानगी मिळवली. हे पाणी शहरात आणण्यासाठी पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून २०१२ मध्ये नव्याने जलवाहिनी टाकण्याच्या कामास प्रत्यक्षात डिसेंबर २०१२ मध्ये सुरुवात केली. एकूण ६ किलोमीटर अंतरावर टाकण्यात येणारी जलवाहिनी ओवळा ते काजूपाडा परिसरातील राष्टÑीय उद्यानातून पुढे ती मुख्य जलवाहिनीला जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर काशिमीरा परिसरातील हाटकेशमार्गे नवीन जलवाहिनी कनाकिया परिसरापर्यंत आणून ती मुख्य जलवाहिनीला जोडण्यात येणार आहे. सध्या या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाने सांगितले असले तरी शहराला पाणी मिळण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.
अतिरिक्त पाण्यासाठी जून उजाडणार
By admin | Updated: May 21, 2014 04:56 IST