मुंबई : मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याची भाषा करणारे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्यावर कारवाई करायला राज्य शासन कुचराई करीत असल्याचा आरोप करतानाच या प्रकरणी भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम बोलत होते. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणावर संताप आणि नाराजी पसरली आहे. त्यांची वक्तव्ये घटनाविरोधी असून, २४ तास उलटूनही राज्य सरकारने अद्याप कोणतीच कारवाई केली नाही. सत्ताधारी भाजपा कारवाई करायला घाबरत आहे की त्यांचा त्यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे, याचा खुलासा भाजपाने करायला हवा. मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्याची भाषा करणाऱ्या राऊतांची खासदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवायला हवा, अशी मागणी निरुपम यांनी केली. शिवसेना आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष भावना भडकविण्याची कामे करीत आहेत. या दोन्ही पक्षांची आक्रस्ताळी भूमिका आणि वक्तव्यांची दखल घेत निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांची मान्यताच रद्द करण्याची मागणी निरुपम यांनी या वेळी केली. निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची भेट घेत भाडेवाढ मागे घेण्याची मागणी केली. गेल्या तीन महिन्यांत बेस्टने दोनवेळा तिकीट दरवाढ केल्यामुळे बेस्टच्या प्रवासीसंख्येत दोन लाखांपेक्षा जास्त घट झाली आहे. बेस्ट बस भाढेवाड, बेस्टच्या वीजदरातील भरमसाठ वाढीमुळे मुंबईकरांचे जीवन असह्य झाले आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या बेस्ट बसच्या पासच्या दरातही दुप्पट भाडेवाढ करण्यात आली. बेस्टने ही अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी अन्यथा मुंबई काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही निरुपम यांनी दिला.
मुस्लीम मतांबाबत भूमिका स्पष्ट करा
By admin | Updated: April 14, 2015 02:16 IST