अभय आपटे ल्ल रेवदंडाअनेक वर्षे एसटी, जीप, रेल्वेतून प्रवास केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मनात उतारवयात का होईना पण विमानाने प्रवास करणारच ही भावना बळावली तर त्यात नवल ते काय वाटायचे? रेवदंड्यातील ७० ते ७८ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन हवाई सफरीचा बेत मनात निश्चित करून सहल पूर्ण केलीच.अलिबागमधील एका ट्रॅव्हल्स एजन्सीकडून ज्येष्ठ नागरिक संस्थेने विमानाचे आरक्षण केले. रेवदंड्यातून सारेजण मिनीबसने मुंबई विमानतळावर गेले. तेथे त्यांना निरोप देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य विरांगण पाटील, कीर्ती पाटील व आशिष बनिया हे हजर होते. यावेळी विरांगण यांनी ३३ ज्येष्ठांना प्रथमोपचार पेटी, समान टोप्या दिल्या. याचा फायदा दिल्लीतील स्थळांना भेटी देताना एकमेकांना गर्दीतही हुडकून काढताना झाल्याचे त्यांनी सांगितले. सिनेमा, जाहिरातीतूनच विमानाचे उड्डाण नि चित्र पाहिलेले मात्र विमान उडतानाचा अनुभव हा विलक्षण असाच असल्याची आठवण सहलीतील चंद्रकांत झावरे यांनी सांगितली. गावाकडून आलेल्या आमच्यासारख्यांनी विमानतळावरील तो भव्यदिव्य आणि नेटका परिसर पाहूनच डोळ्यांचे पारणे फिटल्याचे एका महिला प्रवाशाने सांगितले. अक्षरधाम मंदिर, फाऊंटन शो, बिर्ला मंदिर, लोटस टेम्पल, राजघाट, राष्ट्रपती भवन, तिसऱ्या दिवशी मथुरा नगरी, आग्य्राचा ताजमहाल, फतेपूर, ॠषिकेशचे दर्शन, कमखल येथील दशप्रजापती मंदिर, रोपवेने मानसादेवी मंदिराला भेटी दिल्या.
ज्येष्ठांनी अनुभवली हवाई सफर!
By admin | Updated: January 1, 2015 23:05 IST