Join us

सर्वसामान्यांच्या अपेक्षा उंचावल्या

By admin | Updated: May 19, 2014 05:10 IST

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपाला आता कुणाच्याही कुबड्यांचा आधार घ्यावा लागणार नसल्याने केंद्रात सक्षम प्रशासन देणे शक्य होईल,

कल्याण : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपाला आता कुणाच्याही कुबड्यांचा आधार घ्यावा लागणार नसल्याने केंद्रात सक्षम प्रशासन देणे शक्य होईल, असा विश्वास सर्वसामान्यांकडून व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ नागरिक, पहिल्यांदाच मतदान केलेले तरुण मतदार, सर्वसामान्य कामगार, व्यावसायिक अशा अनेकांनी किमान भ्रष्टाचारमुक्त उत्तम प्रशासन, चांगले रस्ते, पाणी, शासकीय योजनांचा खालच्या स्तरापर्यंत लाभ, व्यवसाय, रोजगाराची हमी अशा किमान अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. कल्याणातीलच मुद्रण व्यवसायातील सुकांत जावडेकर यांनी सांगितले, ‘देशातील गेल्या १५-२० वर्षांतील परिस्थिती लक्षात घेता हे सत्तांतर अपेक्षित होते. त्यात फरक एवढाच की, निर्विवाद बहुमतामुळे कोणत्याही निर्णयासाठी इतरांची मोदी सरकारला मनधरणी करावी लागणार नाही, असे परिवर्तन सर्वांनाच हवे होते. आगीतून फुफाट्यात असे होऊ नये. आपण सामान्य माणसे आहोत. चांगले रस्ते, सतत वीजपुरवठा, जीविताची व कुटुंबाची सुरक्षितता, चांगले शिक्षण याबरोबरच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन एवढ्याच किमान अपेक्षा आहेत. शासनातील कोणत्या कामाला किती वेळ लागतो, याचा काळ निश्चित करून दिरंगाईचे कारण शोधून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. लाच प्रकरणात कारवाई झाल्यास त्या अधिकार्‍याचे त्याच्या सेवा काळातील उत्पन्न किती होईल, हे पाहून त्यापेक्षा अधिक संपत्तीचा त्या अधिकार्‍याला योग्य खुलासा करता आला नाही तर ती संपत्ती अवैध मानून सरकारी तिजोरीत जमा करावी. अशा प्रकारे कारवाई केली तर न्यायालयीन प्रक्रियेचा वेळ वाचून लाचखोरीला आळा बसेल. कल्याणातील ज्येष्ठ नागरिक संघाचे गिरीश बोरसे, अ.ना. भार्गवे यांनी सांगितले की, गेल्या लोकसभेतील काही खासदारांचे-मंत्र्यांचे एकेक घोटाळे पाहिले तर लोकप्रतिनिधी केवळ घोटाळे करण्यासाठीच निवडून जातात का, असा प्रश्न पडतो. सर्वसामान्यांसाठी अनेक योजना आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, तसे होत नाही. ही परिस्थिती बदलली पाहिजे.