Join us  

प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी हे अंतर अवघ्या १० मिनिटांत , 1 किमी बोगदा खोदण्याचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 7:38 AM

सागरी किनारी रस्ता प्रकल्प : काम वेगाने सुरू असल्याचा पालिकेचा दावा

ठळक मुद्देमुंबई किनारी रस्ता प्रकल्प ४ अधिक ४ मार्गिकेचा असून, दक्षिण कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुलापासून ते वांद्रे वरळी पुलाच्या दक्षिण टोकापर्यंत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या सागरी किनारी रस्ता प्रकल्पामध्ये आणखी एक मैलाचा दगड गाठण्यात आला आहे. भारतातील सर्वात मोठा बोगदा खणणाऱ्या मावळा संयंत्राने २ किलोमीटरपैकी १ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. या किनारी रस्ता प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. 

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प ४ अधिक ४ मार्गिकेचा असून, दक्षिण कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुलापासून ते वांद्रे वरळी पुलाच्या दक्षिण टोकापर्यंत आहे. याची तीन भागात विभागणी केली आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत रेक्लेमेशन, बोगदे, पूल तयार करून  रस्ता, प्रोमेनाईड, बगीचे, वाहनतळ, बस डेपो व इतर नागरी सुविधांचा समावेश आहे. सध्याच्या किनाऱ्यापासून सुमारे ७० ते १०० मीटर रुंदीचा भराव करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या ३ पैकी प्रामुख्याने २ पॅकेजमध्ये भरावांचे काम अंतर्भूत आहे. त्याप्रमाणे अमरसन गार्डन, टाटा गार्डन, महालक्ष्मी मंदिरामागे, हाजी अली दर्गा, लव्हग्रोव नाला, वरळी सीफेस येथील समुद्रकिनारा नैसर्गिक दगडाच्या सामानाने भरण्यात येत आहे. भरावाचे समुद्रलाटांपासून संरक्षण करण्यासाठी व सागरी जीवसृष्टीचा विकास करण्यासाठी मोठ्या नैसर्गिक दगडांची भिंत बांधण्यात येत आहे.

कोस्टल रोड तीन भागातपहिला भाग : प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शिनी गार्डनपर्यंत प्रामुख्याने मलबार हिलखालून जाणाऱ्या दोन स्वतंत्र बोगद्यातून ४ किमीचा रस्ता.दुसरा भाग : प्रियदर्शिनी गार्डन ते हाजी अली दर्ग्याजवळील बडोदा पॅलेस पर्यंत रेक्लेमेशनवरील व पुलावरील ३.८७ किमीचा मुख्य रस्ता व अमरसंस गार्डन येथे ४ आर्म असलेला इंटरचेंज आणि हाजी अली दर्ग्याजवळील ८ आर्म असलेला इंटरचेंज रस्ता असेल.तिसरा भाग : बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत रेक्लेमेशनवरून व दोन पुलावरील २.७१ किमीचा मुख्य रस्ता व वरळी येथील थडाणी जंक्शन समोर ६ आर्म असलेला इंटरचेंज रस्ता असेल.

१० मिनिटांत पार : प्रकल्पामुळे ७० टक्के वेळेची बचत होईल. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी हे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करता येईल. हे अंतर पार करण्यासाठी ४५ मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी आता लागतो. हा रस्ता पूर्णतः टोलमुक्त असून तीन इंटरचेंजच्या माध्यमातून प्रवास करता येईल.

टॅग्स :मुंबईसागरी महामार्ग