मुंबई : वर्षभरापूर्वीच टपाल खात्याने मुंबईतील पहिले एटीएम चेंबूरमध्ये सुरू केले होते. मात्र काही दिवसांतच या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाले. परिणामी ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे पोस्टातील खातेदारांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच चार दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पोस्टाने ही एटीएम सुविधा सुरू केली आहे.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासगी बँका ग्राहकांना अधिकाधिक सुविधा पुरवीत आहेत. त्यामुळे खासगी बँकांच्या पावलावर पाऊल ठेवत टपाल विभागानेही ग्राहकांसाठी एटीएम सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली आणि चेन्नईनंतर टपाल विभागाने मुंबईतील पहिले एटीएम चेंबूरमधील मुख्य टपाल कार्यालयात सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार टपाल विभागाच्या सचिव पद्मिनी गोपीनाथ यांच्या हस्ते ६ मार्च २0१४ रोजी हे एटीएम सुरू करण्यात आले. मात्र काही दिवसांनंतर अचानक हे एटीएम बंद करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांसह टपाल खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत त्यांनी काही अधिकाऱ्यांना विचारले असता आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे कारण देत पोस्ट विभागानेच या केंद्राला टाळे ठोकल्याची माहिती त्यांना देण्यात आली. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित करताच टपाल विभागाने तत्काळ या तांत्रिक अडचणी दुरुस्त केल्या आणि चार दिवसांपूर्वी पुन्हा एकदा हे एटीएम सेंटर सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
अखेर पोस्टाचे एटीएम सुरू झाले
By admin | Updated: June 9, 2015 01:52 IST