डोळखांब : जून महिन्यात आगमन करणारा वरूणराजा यंदा मात्र अनियमितपणे कधीही बरसत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकरीवर्गाला बसत आहे. ऐन उन्हाळ्यात दिवसभर प्रचंड उन्हाचा तडाखा तर सायंकाळी अवकाळी पाऊस, वादळ या दुहेरी संकाटत शेतकरी तसेच सामान्य जनता सापडली आहे. उन्हाळ्यात शहापूर तालुक्यातील शेतकरी वाल, मुग, उडीद, चवळी यासारखी पिके घेतात. त्याचबरोबर बहुतांश शेतकरी भाजीपाला लागवड करतात. यावर्षी मात्र, शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांच्या हातात मुद्दल देखील मिळाली नाही.तालुक्यात डोळखांब, किन्हवली, शेंदु्रण, फळगाव, वासिंद, खातिवली परिसरात गेल्या चार दिवसांपासून रोजच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी देत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जमा केलेल सरपण, गुरांसाठी साठवलेला चारा भिजून ओला झाला. आदिवासी मजुरांच्या झोपड्यांची नासधूस झाली आहे. या उलट तालुक्यातील पाणीटंचाई मात्र जैसे थे आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी भाजीपाला शेतकऱ्यांचे आदिवासी मजुराच्या झोपड्या , रब्बी पिके इत्यादी नुकसान झाले आहे. याबाबत आतपकालीन यंत्रणेची बैठक शहापूर तालुका तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. (वार्ताहर)दोन दिवसांपासून वीजांच्या कडकडाटांसह पडणाऱ्या पावसाने शुक्रवारी संध्याकाळपासून संपूर्ण विभागाला सोसाट्याच्या वाऱ्यासह गारिपटीने झोडपून काढले त्यामुळे सगळीकडे एकच तारांबळ उडाली. तब्बल दोन ते अडीच तास गारांचा पाऊस पडत होता. तर यानंतर आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक घरांचे नुकसान झाले. दळखण, खर्डी स्टेशन, गोलभण, जरंडी भागातील विद्युत खांब वाकल्याने तसेच दुघर येथे वैतरणाकडे जाणारी लाईन तुटल्याने दहिगाव, पळशिण, टेंभा, बेलवड, अंबिवली या भागांची वीज खंडीत झाली आहे. खर्र्डीतील गणेश राऊत शॉपिंग कॉम्प्लेक्सचे छप्पर, गणेश अधिकारी, रीयाज शेख, अनंत शिवराम रामधरणे, रोहिदास नगर येथिल शशिकांत भोईर, महात्मा फुले कॉलनीतील कृष्णा बर्वे, बेबीबाई पंडीत यांच्या बरोबरच अनेक जणांच्या घरावरील पत्रे उडाल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. खर्डी हायस्कूल जवळील झाड एका दुकानावर पडल्याने दुकानाचे छप्पर तुटले तर खर्डी वैतरणा रस्त्यावर जवळपास दिडशे वर्षा पुर्वीचे जुने वडाचे झाड रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाड्याकडे जाणारी वाहतूक रस्त्यात खोळंबली. विजेचे खांब ठिकठिकाणी वाकल्याने रात्री पासुन विज पूरवठा खंडीत झाला आहे तो पूर्ववत होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने घरांचे लाखो रु पयांचे नुकसान केले असल्याने रिहवाशी मोठ्या चिंतेत पडले आहेत. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसुल विभागाने (तलाठी) सुरू केले आहे.नुकसान झालेल्या घरांची पहाणी करण्यासाठी सकाळी तहसिलदार अविनाश कोष्टी आणि आमदार पांडुरंग बरोरा यांनी खर्डी विभागाला भेट दिली व झालेल्या नुकसानीची पहाणी करून नुकसानग्रस्तांना भरपाई लवकरात लवकर दिली जाईल असे अश्वासन त्यांनी दिले.
अवकाळी की बारमाही; शेतकरी संभ्रमात
By admin | Updated: May 16, 2015 22:54 IST