Join us

१९ दुकानांवर अखेर पालिकेचा हातोडा

By admin | Updated: February 7, 2015 23:12 IST

एक वर्षापासून रखडलेल्या वर्तकनगर येथील म्हाडाच्या अंतर्गत रस्त्यात असलेल्या बांधकामांवर अखेर हातोडा पडला आहे.

ठाणे : एक वर्षापासून रखडलेल्या वर्तकनगर येथील म्हाडाच्या अंतर्गत रस्त्यात असलेल्या बांधकामांवर अखेर हातोडा पडला आहे. त्यामुळे येथील आता १२ मीटरचा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळपासून येथे कारवाई करण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, प्रथम पुनर्वसन करा, मगच कारवाई करा, असा पवित्रा काही दुकानदारांनी घेतला होता. परंतु, त्यांच्या पुनर्वसनाची हमी दिल्यानंतर अखेर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे १९ गाळे जमीनदोस्त करण्यात आले. तसेच कळव्यातील स्मशानभूमीच्या भागात झालेल्या अनधिकृत बांधकामांवरदेखील पालिकेने हातोडा टाकला आहे. वर्तकनगर येथील म्हाडाच्या अंतर्गत १२ मीटर रस्त्याचे रुंदीकरण मागील वर्षभरापासून काम रखडलेले आहे. चार महिन्यांपूर्वी पालिकेने येथील २८ गाळे तोडले होते. त्यानंतर, ही कारवाई थंडावली होती. अखेर, शनिवारी पुन्हा ही कारवाई सुरू झाली. परंतु, या रस्त्यात येणाऱ्या दुकानदारांनी या कारवाईला विरोध केल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाला पोलिसांना पाचारण करावे लागले. परंतु, सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील काही दुकानदारांनी कारवाईस विरोध करून प्रथम पुनर्वसन करा, मगच कारवाई करा, अशी मागणी केली. अखेर, त्यांना पुनर्वसनाची हमी देण्यात आल्यानंतर पालिकेने येथील १९ गाळ्यांवर हातोडा टाकला. या दुकानाच्या गाळ्यांचे आता म्हाडाच्या वतीने पुनर्वसन करण्यात येणार आहे.दुसरीकडे कळव्यातील मनीषानगर भागातील स्मशानभूमीलगत उभारण्यात आलेल्या ३० टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला आहे. या कारवाईमुळे आता येथील स्मशानभूमीच्या विस्तारीकरणासह सुशोभीकरणाचा मार्गदेखील मोकळा झाला आहे. या भागाची आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ३ फेब्रुवारीला पाहणी केली होती. त्यानंतर, आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)