पनवेल : उरण परिसरात उमेदवारांकडून घरोघरी जाऊन मतदारांशी सुसंवाद साधला जात असून आपल्या कार्याविषयी, लढाईविषयी ते संवाद साधत आहेत.मी माझ्या ३५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कुठल्याही कंपनीचा ठेका घेतला नाही. जर कुठले कंत्राट घेतले असेल तर ते जनतेच्या विकास कामांचे, असे आमदार विवेक पाटील मतदारांना सांगत आहेत. माझी लढत ही कंत्राटदारांशी आहे. मी कंत्राटासाठी प्रयत्नही केले नाहीत, म्हणून जेएनपीटी, ओएनजीसी, जीटीआय यासारख्या अन्य कंपन्यांमध्ये कामगारांचे प्रश्न उपस्थित झाल्यास आम्ही तेथेही पोहोचतो. लोकप्रतिनिधींनी आपल्या आचरणातून जनतेपुढे आदर्श निर्माण करावा, असे म्हणत आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले.पाटील म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांच्याकडून आम्हाला बऱ्याच अपेक्षा होत्या. काहीतरी चांगले काम करुन प्रकल्पग्रस्तांना, शेतकऱ्यांना न्याय देतील, अशी आशा होती. परंतू तसे काही झालेले दिसत नाही. एसईझेडच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही असेच. कुठलाही विकासक नेमला नाही, निविदा नाही की कार्य निर्देश नाही. सरळ भूमिपूजन करुन मोकळे. एनएच ४बीच्या दहापदी रस्त्यांचे भूमिपूजन सुध्दा याच प्रकारे केले. न कुठलेही अंदाज पत्रक मंजूर झाले, ना कुठलीही निविदा मागवली, ना कार्य आदेश दिला. त्यामुळे नागरिकांनीही या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. असा सल्ला त्यांनी दिला. आपल्या विभागात होणाऱ्या विमानतळाच्या प्रकल्पामध्ये, जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनलच्या प्रकल्पात, न्हावा शिवडी सी लिंकच्या कामात स्थानिक माणसाला रोजगार मिळालाच पाहिजे, ही आमची मागणी राहील. (वार्ताहर)
उरणमध्ये घरोघरी प्रचारावर भर
By admin | Updated: October 8, 2014 01:28 IST