Join us  

एल्फिन्स्टन दुर्घटनेचा मानसिक धक्का, जखमी प्रवाशाने मुंबईच सोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 6:01 AM

रात्री झोप लागत नाही... सारखी ती घटना आठवते, तो प्रसंग डोळ्यांसमोरून जात नाही.. माझ्याच सोबत असे का झाले? अजूनही कानात मदतीची साद घालणारे आवाज घुमताहेत..

मुंबई : रात्री झोप लागत नाही... सारखी ती घटना आठवते, तो प्रसंग डोळ्यांसमोरून जात नाही.. माझ्याच सोबत असे का झाले? अजूनही कानात मदतीची साद घालणारे आवाज घुमताहेत.. असे म्हणत एल्फिन्स्टन दुर्घटनेतील एका जखमी प्रवाशाने जबरदस्त मानसिक धक्का बसल्याने मुंबापुरीची वाट सोडून मूळगाव उत्तर प्रदेश गाठले आहे.एल्फिन्स्टन दुर्घटनेतील जखमींचे केईएम रुग्णालयाच्या १५ डॉक्टरांच्या चमूद्वारे समुपदेशन सुरू आहे. या समुपदेशनाविषयी बोलताना केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर म्हणाल्या की, या जखमींच्या मनात भीती आणि भावनांचा गोंधळ आहे. काहींना यंत्रणेविषयी राग आहे, काहींच्या मनात त्या घटनेचे दु:ख आहे, तर काहींच्या मनात कायमच्या भीतीने घर केले आहे. यातील एका जखमीने दुर्घटनेच्या धक्क्यामुळे मुंबई सोडली आहे.मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला हा जखमी पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आला होता. मात्र या दुर्घटनेमुळे घाबरून तो मुंबई सोडून त्याच मूळगावी उत्तर प्रदेशला परत गेल्याची माहिती डॉ. पारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :एलफिन्स्टन चेंगराचेंगरीमुंबई उपनगरी रेल्वेआता बास