कर्जत : तालुक्यातील ४५ गावे पश्चिम घाटमधील पर्यावरण क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु आहेत. या इको सेन्सेटिव्ह झोनमुळे संबंधित ४५ गावांच्या विकासावर आणि तेथील रोजगाराच्या निर्मितीवर अनेक निर्बंध येणार आहेत.कस्तुरीरंजन समितीने कोकण प्रांतात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जैव उत्खननावर निर्बंध घालण्यासाठी पश्चिम घाट हा पर्यावरणदृष्टया संवेदनशील घोषित करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती. त्यानुसार कर्जत तालुक्यातील एकूण १८५ महसूल गावांपैकी ४५ गावे ही पश्चिम घाट इको सेंसेटिव्ह झोनमध्ये समाविष्ट केली आहेत. तालुक्यातील ४५ गावांमध्ये २६६ चौरस किलोमीटर भागात सीमा निश्चित करण्याच्या हालचाली रायगड जिल्ह्यात महसूल आणि वन विभागाकडून सुरु आहेत. त्यासाठी वन, महसूल, कृषी आणि ग्रामपंचायत विभागावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र जी गावे पश्चिम घाटात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु आहेत, त्या ठिकाणच्या गावामध्ये त्यांना हरकती घेण्याबाबतही संधी दिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या गावांचा बळी इको झोनमध्ये जाण्याचा संभव आहे. महसूल विभाग या ठिकाणी वन विभागाच्या मदतीने सीमा निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहे.
कर्जतमध्ये ४५ गावांवर इको-सेन्सेटिव्हचे भूत
By admin | Updated: December 23, 2014 22:33 IST