मुरबाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनेला भारत सरकार पेयजल विभागाचे संयुक्त सचिव सत्यप्रद साहू व क्षेत्रीय अधिकारी राज शेखर यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात स्थानिकांच्या समस्या समजावून घेतल्या़ या वेळी त्यांनी सांगितले की, प्रत्येक घरात नळजोडणी व शौचालय झालेच पाहिजे, असे भारत सरकारचे उद्दिष्ट असून सर्वांनी रेन वॉटर हार्व्हेस्टिंग करून घ्यावे.या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिरवली डॅमला प्रत्यक्ष भेट देऊन या योजनेच्या पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचा साठा पुरेपूर होतो की नाही, तसेच या ठिकाणच्या यंत्रसामुग्रीची पाहणी करून मुरबाड ग्रामपंचायत हॉलमध्ये सरपंच अर्जुन शेलके, उपसरपंच मोहनिश तेलवणे, सुधीर तेलवणे, ग्रामसेवक व्ही. के. मिरकुटे व अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेऊन ग्रामपंचायतीचे उत्पन्न तसेच नळपाणी योजनेची वसुली या संदर्भात माहिती घेतली. या वेळी त्यांनी सांगितले की, प्रत्येक घरात नळ व शौचालय देऊ तसेच शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे २०२२ पर्यंतचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. या मुरबाड नळपाणी योजनेसाठी सरकारने ११ कोटी व राज्य सरकारने ११ कोटी रुपये असे २२ कोटी रुपये खर्च केले आहेत. (वार्ताहर)
प्रत्येक घरात नळजोडणी, शौचालय देणार - साहू
By admin | Updated: July 21, 2014 00:46 IST