Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला गार वाऱ्यासह धुळीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:07 IST

पारा १७ अंश; उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातही किमान तापमान घसरलेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात थंडी ...

पारा १७ अंश; उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातही किमान तापमान घसरले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात थंडी पुन्हा परतली आहे. शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दरम्यान, येथील धुळीचे साम्राज्य मात्र कायम आहे. त्यामुळे मुंबईकरांना एकाचवेळी धूळ आणि थंडी असा दोघांचा सामना करावा लागत आहे. हवामानातील हे बदल पुढील काही दिवस कायम राहतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात किमान तापमानात घट झाली आहे. मुंबईचे किमान तापमानही खाली उतरले आहे. नाशिक, जळगाव, डहाणू, पुणे, परभणी, महाबळेश्वर, बारामती आणि माथेरान येथील किमान तापमानात चांगली घट नोंदविण्यात आली. येथील किमान तापमान १२ ते १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

दरम्यान, मुंबई आणि नवी मुंबईत प्रदूषणाचा स्तर कायम आहे. ऐरोली येथे मोठ्या प्रमाणावर धूळ पसरल्याने दृश्यमानता कमी झाली होती. मुंबईतही विमानतळ परिसर, वांद्रे-कुर्ला संकुल आणि वरळी परिसरात शुक्रवारी धुळीचे साम्राज्य होते. धूर, धूळ आणि धुके यांच्या मिश्रणाने पसरलेले हे धूरके आराेग्यासाठी तापदायक ठरत आहे.

............................