Join us

पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा सुस्त कारभार

By admin | Updated: July 15, 2014 00:31 IST

महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्रिस्तरीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्रिस्तरीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कागदावर बळकट वाटणारी यंत्रणा प्रत्यक्षात मात्र तकलादू असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. नियंत्रण कक्षाचा जनतेशी संपर्क तुटला असून ठाणे पालिकेच्या धर्तीवर व्यवस्था निर्माण करण्याची वेळ आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने यावर्षीही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मुख्यालयामध्ये मुख्य नियंत्रण कक्ष असून प्रत्येक परिमंडळमध्ये एक व प्रत्येक विभाग कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार केले आहेत. या ठिकाणी चोवीस तास मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. कागदावर ही यंत्रणा बळकट दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र येथील कारभार पूर्णपणे नियोजनशून्य प्रकारे सुरू आहे. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी अद्याप आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची पुस्तिका नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आलेली नाही. विविध कारणांनी पुस्तिका छापण्यास विलंब होवू लागला आहे. नगरसेवक, प्रसारमाध्यमे व सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत या पुस्तिका कधी पोहचणार याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य नियंत्रण कक्ष नवीन मुख्यालयात हलविण्यात आला आहे. यामुळे येथील नंबर बदलला असून त्याची माहितीही अनेक नागरिकांना नाही. नवी मुंबईमध्ये एखादी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर त्याची पुरेशी माहिती कक्षाकडे नसते. याविषयी माहिती घेण्यासाठी आयुक्त किंवा मुख्यालय उपआयुक्तांशी संपर्क साधावा लागतो. काही दिवसांपूर्वी तुर्भे गावामध्ये सकाळी मार्केटजवळील संरक्षक भिंत कोसळली. परंतु रात्रीपर्यंत मुख्य नियंत्रण कक्षाकडे जखमींची नावेच उपलब्ध नव्हती. शहरातील पावसाचे प्रमाण सोडले तर इतर कोणतीही माहिती पटकन उपलब्ध होत नाही. सर्वसामान्य नागरिकांचा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. तो जोडण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. पावसाचे दिवस संपले की आपत्ती नियंत्रण कक्ष जवळपास असून नसल्यासारखा होवून जातो. यामुळे कागदावर बळकट असणारी ही यंत्रणा प्रत्यक्षात मात्र काहीही उपयोगाची राहिलेली नाही. याविषयी माहिती घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख जगन्नाथ सिन्नरकर यांच्याशी संपर्क साधला, परंतु मंत्रालयात मीटिंगला असल्यामुळे त्यांचा संपर्क होवू शकला नाही.