रेवदंडा : नाताळची शाळांना पडलेली सुटी, वर्षाअखेरीसाठी पर्यटकांची किनाऱ्याला असलेल्या पसंतीचा ओघ पाहता काशीद, मुरुड व नागाव या गावांना पर्यटकांनी मोठ्या संख्येने स्वत:च्या वाहनाने हजेरी लावली असून या वाहनांचा फटका रेवदंडा गावाला बसला असून येथील जनजीवन विस्कळीत होत आहे.गेले अनेक वर्षे बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रश्न पूर्णत्वास गेलेला नाही. अवजड वाहनांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने बाह्यवळण रस्ता तयार केला असला तरी त्याचा वापर करण्यास वाहनचालक राजी नाहीत काही ठिकाणी वेडीवाकडी वळणे आहेत. गतिरोधक बसवले असले तरी तेथे फलक नाहीत. चौल चौकी भागातील खड्डे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्याची स्थिती असल्याने वाहनचालक तेथून जाण्यास राजी नाहीत. रेवदंडा बाजारपेठेत अरुंद रस्ता आणि पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा अनेक प्रसंगी वाहने उभी असतात. एकंदरीत वाहतुकीच्या नियंत्रणाबाबत उदासीनता दिसत आहे. सध्या नाताळ आणि वर्षाखेर यामुळे वाहतूक समस्या गंभीर बनत चालली आहे. (वार्ताहर)
पर्यटकांच्या वाहनांमुळे बाजारपेठेत कोंडी
By admin | Updated: December 26, 2014 22:39 IST