Join us

पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

By admin | Updated: June 27, 2015 22:37 IST

पनवेल-सायन महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. दुचाकी वाहने घसरणे, अवजड वाहने पलटी होणे, कार दुभाजक

- वैभव गायकर

 पनवेल,  पनवेल-सायन महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. दुचाकी वाहने घसरणे, अवजड वाहने पलटी होणे, कार दुभाजक अथवा साईडपट्ट्यांना धडकणे आदी घटना सतत घडत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे अंदाज येत नसल्याचे अपघात वाढले आहेत. तब्बल १२०० कोटी खर्चून उभारलेल्या या महामार्गाचे कामही अद्याप काही ठिकाणी अपूर्ण आहे. टोलवसुली होऊनही वाशी टोलनाक्यापासून सुरू झालेला खड्ड्यांचा प्रवास कळंबोली सर्कलपर्यंत पाहायला मिळतो. महामार्गावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल टोलवेज प्रा. लि. या कंपनीला टोलवसुलीचा ठेका दिला आहे. मात्र मार्गावरील खड्डे जैसे थे आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात अनेकदा महामार्गावर अपघात घडले आहेत. नव्याने उभारण्यात आलेल्या कामोठे उड्डाणपुलावरही अवघ्या काही दिवसांत मोठमोठे खड्डे पडले आहेत. कोपरा गावाजवळील उड्डाणपुलाखालील रस्त्याची अवस्थाही अशीच आहे. बेलापूर व बेलापूर खिंडीजवळील उरण फाटा उड्डाणपुलाखालून अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. सा. बां. विभाग असो वा टोल वसूल करणारी कंपनी, सर्वांचेच खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत आहे. या खड्ड्यांमध्ये दररोज अनेक गाड्या अडकत असून एखादी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न वाहनचालकांकडून विचारण्यात येत आहे. वाशीहून पनवेलकडे येताना जुईनगर, नेरूळ, एलपी उड्डाणपुलावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहेत. कळंबोली उड्डाणपुलाखाली, खारघर टोलनाक्यासमोर, तसेच सानपाडा, नेरूळ परिसरांत पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नसल्यामुळे पावसाला सुरुवात होताच रस्त्यावर पाणी साचते. याठिकाणी उड्डाणपूल उभारले असले तरी त्याखालील रस्ता रुंदीकरण मात्र रखडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सायन-पनवेल महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरु स्तीचे काम आम्ही हाती घेतले आहे. सध्या बैठकीसाठी दिल्लीला आहे. परत आल्यावर सविस्तर बोलता येईल. - रमेश आगवणे, अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग. सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन- पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करून वाहनचालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अवघ्या वर्षभरात मार्ग खड्डेमय झाल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दुचाकीस्वारांसाठी तर हा रस्ता धोकादायक असून याठिकाणी वारंवार अपघात घडतात. - किशोर सामंत, ( वाहनचालक)