बिरवाडी : रायगड जिल्ह्यासह महाड तालुक्यात डिसेंबरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मळणी करत रचून ठेवलेला पेंढा, सुके गवत आदी चारा भिजला आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बदलत्या हवामानामुळे ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने त्याचा फटका जनावरे सांभाळणाऱ्या शेतकरी वर्गाला बसला. रायगडमधील मुख्य पीक हे भात असल्याने शेतकऱ्यांना चाऱ्याकरिता सुके गवत किंवा पेंढ्यावर अवलंबून रहावे लागते, मात्र बदललेल्या हवामानामुळे पावसाची अनिश्चितता कायम झाली आहे. त्याचा फटका शेतकरीवर्गाला बसला असून कडधान्याच्या पीक उत्पादन क्षमतेलाही अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. रायगड जिल्ह्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे चित्र सध्या तालुक्यात पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)
अवकाळी पावसामुळे गुरांचा चाराप्रश्न गंभीर
By admin | Updated: December 17, 2014 23:05 IST