Join us

मच्छीमारांच्या मेहनतीवर अवकाळी पावसामुळे पाणी

By admin | Updated: November 17, 2014 00:15 IST

गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ आकश, पाऊस यामुळे सुकविण्यासाठी ठेवलेल्या बोंबिल खाली पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

डहाणू: गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ आकश, पाऊस यामुळे सुकविण्यासाठी ठेवलेल्या बोंबिल खाली पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मच्छिमारांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी डहाणू सोसायटीच्या वतीने केले आहे.डहाणू तालुक्यातील चिंचणी, वरोर, गुंजवाडा, तडीयाळी, बाडापोखराज, धा. डहाणू, डहाणू गाव, आगर, चिख्ला ते झाई पर्यंतच्या किनारपट्टीवर मोठया प्रमाणात मच्छिमार राहत असून त्यांचा मासेमारी हा एकमेव उदरनिर्वाहाचे साधन आहे. गेल्या दोन महिन्यापासून या परिसरात रात्रंदिवस बोंबिलाची मासेमारी केली जात असल्याने बोंबिल सुकविण्यासाठी कडक उन्हाची आवश्यकता असताना गेल्या तीन चार दिवसांपासून खराब हवामानामुळे तसेच शुक्रवार, शनि, रविवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे किनारपट्टीवर वाळत टाकलेले सुके बोंबिल खाली पडून गेल्याने या भागांत प्रचंड दुर्गंधी पसरली आहे संपूर्ण कुटुंबासह रात्रंदिवस मेहनत केलेल्या शेकडो टन बोंबिल सडल्याने येथील मच्छिमार हवालदिल झाला आहे.डहाणूचे सुके बोंबिल सर्वत्र प्रसिद्ध असून पावसाळ्याच्या दिवसांत त्याला मोठी मागणी असते. येथील बोंबिल नासिक, जळगाव, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, यवतमाह, बुलढाणा इत्यादी भागात दरवर्षी हजारो टन खरेदी विक्री केली जाते. पावसाळ्याच्या दिवसांत मासेमारी बंद रहात असल्याने येथील मच्दिमार सुके बोंबिल विकून संसार चालवित असते. दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांबरोबरच या भागातील मच्छिमारांचे देखील लाखोंचे नुकसान झाले असून शासनाने शेतकरी तसेच मच्छिमारांना मदत करावी अशी मागणी मच्छिमार नेते शशिकांत बारी यांनी केली आहे. (वार्ताहर)