बोर्ली-मांडला : शासनाच्या दुर्लक्षामुळे मुरुड तालुक्यातील २,२६६ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता असलेले फणसाड धरण कोरडे पडले आहे. गेल्या दोन वर्षांपासून धरणातील पाइपलाइनचा व्हॉल्व नादुरुस्त असल्यामुळे पाणी वाया जात आहे. त्यामुळे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना सातत्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. धरणाच्या व्हॉल्वची दुरुस्ती करावी, अशी मागणी मुरुड पंचायत समिती सभापती काळी ठाकूर, माजी सभापती रमेश नागावकर, बोर्ली सरपंच चुनेकर यांनी उपजिल्हाधिकारी बागल यांना निवेदन देऊन केली. २१ मे रोजी फणसाड धरणात ०.१०९ द.ल.घ.मीटर पाणीसाठा होता. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने रायगड पाटबंधारे विभाग कोलाड यांनी २३ मे रोजी फणसाड धरण रिक्त झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला आहे. मुरुड तालुक्यातील भोईसर ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील फणसाड धरणातून बोर्ली, मांडला, काकळघर, कोलई व भोईसर आदी पाच ग्रामपंचायतींना या धरणातून पाणीपुरवठा होतो. परंतुु फणसाड धरणाचा मुख्य दरवाजा (गेटव्हॉल्व) नादुरुस्त असल्याने धरणातील पाणी वाया जात असे. त्यामुळे पाण्याचा साठा कमी होत असल्याने पाचही ग्रामपंचायतींना पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. (वार्ताहर)
नादुरुस्त व्हॉल्वमुळे फणसाड धरण कोरडे
By admin | Updated: June 2, 2015 22:45 IST