पालघर : पालघर कृषीउत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक पालघर यांची नेमणूक करण्यात आली आहे. पालघरचे सहाय्यक निबंधक सुरेश अंधारे यांनी आपला कारभारही हाती घेतल्याचे सांगितले.भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची संचालक मंडळे बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीची वाढीव मुदत ३० आॅक्टोबर २०१४ रोजी संपल्याने संचालक मंडळ बरखात्य करून १४ डिसेंबर सहाय्यक निबंधक अंधारे यांनी चार्ज घेतला आहे. आता प्रशासकाच्या नेमणुकीनंतर आगामी पाच वर्षांसाठी नवीन संचालक मंडळासाठी लवकरच निवडणुका होणार आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रशासकीय ताबा घेतल्यानंतर सहा. निबंधकांनी बाजार समितीचे उत्पन्न वाढावे यासाठी वसूली नाक्याकडे लक्ष केंद्रीत केले असून केबीनचे दुरुस्ती, विद्युतीकरण या दुरुस्त्याकरून मरगळ आलेल्या समितीला उर्जीतावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले. बाजारसमितीमध्ये फारपूर्वी बांधलेले ६७ गाळे दुरावस्थेत पडून असून ज्या व्यापाऱ्यांना अनामत रक्कम भरल्या आहेत, त्यांनी पूर्ण रक्कम भरून त्या गाळ्यांचा ताबा घेऊन ते सुरु करावेत अशी विनंती व्यापाऱ्यांना केल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
पालघर बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त
By admin | Updated: December 17, 2014 23:21 IST