नवी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नवी मुंबई महापालिका आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे संकेत दिल्यानंतर स्थानिक नेत्यांत चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. नवी मुंबईतील स्थानिक शिवसैनिकांनी युतीला विरोध केला आहे. मात्र पक्षाच्या स्थानिक नेत्यांना युती हवी आहे. युती झाल्यास शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांचा फायदा होईल, असे त्यांचे मत आहे. आता अंतिम बोलणी गुरुवार-शुक्रवारी मातोश्रीवर होणार असल्याचे संकेत स्थानिक नेत्यांनी दिले आहेत. मात्र या चर्चेपासून महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी संघटना, रिपाइं यांना चार हात लांब ठेवल्याने ते शिवसेना-भाजपावर रुसले आहेत.नवी मुंबई महापालिकेचे १११ प्रभाग असून निम्म्या जागांवर भाजपाने हक्क सांगितला आहे. यासाठी त्यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत बेलापूर-ऐरोली मतदारसंघात मिळालेल्या मतांच्या आकडेवारीचा हवाला दिला जात आहे. यानुसार ३७ प्रभागांत भाजपा आघाडीवर तर १२ प्रभागांत दुसऱ्या स्थानी होती. त्यामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निम्म्या जागा मिळायलाच हव्यात असा त्यांचा आग्रह आहे. परंतु भाजपास शहरातील १११ प्रभागांत उमेदवार मिळणे मुश्किल असून त्यांच्याशी युती करू नये, असे स्थानिक शिवसैनिकांचे मत आहे. युतीत भाजपाचा फायदा तर शिवसेनेचे मोठे नुकसान होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. गेल्या पाच वर्षांत शिवसैनिकांनी शहरात सर्वदूर कामे केली असून त्याचे श्रेय नाहक भाजपास मिळू शकते, असा त्यांचा दावा आहे. तर स्थानिक नेते मात्र भाजपास ३५ जागा देण्यास तयार झाले आहेत. त्यास मात्र भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी विरोध करून निम्म्या जागा मागितल्याने युतीबाबत चर्चाच होत आहे. अंतिम निर्णय झालेला नाही. त्यातच रासप, रिपाइं आणि स्वाभिमानींनी जागा मागितल्याने युतीच्या नेत्यांची पंचाईत झाली आहे. यात रामदास आठवले आणि महादेव जानकर यांनी प्रत्येकी १५ जागा मागितल्या आहेत. मात्र त्यांना एक जागा सोडणे तर दूरच स्थानिकांसह युतीच्या श्रेष्ठींनी अस्पृश्यता बाळगून चार हात लांब ठेवले आहे. (खास प्रतिनिधी)
युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच
By admin | Updated: April 2, 2015 01:01 IST