पालघर : पश्चिम रेल्वेच्या सफाळा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या छपरावरील पत्रे रेल्वे प्रशासनाने काढल्याने ऐन पावसाळ्यामध्ये प्रवांशाना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसात भिजू नये म्हणून ट्रेन पकडण्याच्या धावपळीत अपघात होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.सफाळा रेल्वे स्टेशन पालघर तालुक्यातील मध्यवर्ती स्टेशन आहे.येथून माकुणसार, आगरवाडी, कपासे, विलंगी, कोरे, दातिवरे, एडवणआदी ५० गावांतील ३० ते ३५ हजार प्रवासी मुंबई व गुजरातच्या दिशेने दररोज प्रवास करतात. अप-डाऊन मार्गावरून दररोज ४० ते ४५ ट्रेन येथे थांबतात. या स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नं.दोन वरील छप्पर फूट ओव्हर ब्रीज बांधण्यासाठी काढण्यात आले आहेत. मात्र पुलाचे बांधकाम अद्यापही सुरु केले नसल्याने छप्पर काढण्याची गरजच काय होती, असा प्रश्न माकुणसारच्या प्रवाशांनी केला आहे. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्मवरील छप्पर काढल्याने अनेकवेळा पावसात भिजावे लागते. अनेकवेळा छोटे-मोठे अपघात होत आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.अनेकवेळा डब्यात चढण्यासाठी महिलांसह अन्य प्रवाशांची झुंबड असते. पावसाच्या दिवसात ट्रेन पकडण्याच्या धावपळीत पाय घसरून पडणे, पाय मुरगळणे असे अपघात होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्यापही उपाययोजना करण्यात आली, नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा प्रवाशांनी दिला आहे. (वार्ताहर)
प्लॅटफार्मवरील छपर काढल्याने असंतोष
By admin | Updated: June 14, 2015 22:46 IST