हायटेक युगात ई कारभारातून पालिकेचे कामकाज आॅनटाइम करण्याचा दावा प्रशासन करीत आहे़ मात्र नागरी समस्या सोडविण्यात कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या तत्परतेने या हायटेक कारभारालाच सुरुंग लावला आहे़ २४ तास पाणीपुरवठ्याची हमी देणारी पालिका यंत्रणा दूषित पाण्याची तक्रार सोडविण्यासाठी तब्बल पावणेतीन महिन्यांचा कालावधी लावत असल्याची धक्कादायक बाब एका सर्वेक्षणातून उजेडात आली आहे़ अकार्यक्षम अधिकारी आणि बेफिकीर नगरसेवकांमुळे पालिका यंत्रणा पुन्हा एकदा मुंबईकरांच्या परीक्षेत नापास झाली आहे़२०१२च्या निवडणुकीमध्ये महापालिकेत महिला व तरुणांचे राज्य आले़ पाणी, स्वच्छता, आरोग्याविषयी महिला संवेदनशील असतात़ त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यात नगरसेविका आघाडीवर असतील, अशी अपेक्षा होती़ पण महिलाच नव्हे, तर तरुण नगरसेवकांनीही नागरिकांची घोर निराशा केली़ पहिल्याच वर्षी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या प्रगतिपुस्तकावर लाल शेरे लागले़ कामाचा अनुभव, व्याप वाढला की या नवीन नगरसेवकांना कामाचा हुरूप येईल, आपली जबाबदारी कळेल, अशी आशा होती़ परंतु सलग तिसऱ्या वर्षी नगरसेवक प्रजेच्या परीक्षेत नापास झाले आहेत़पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य या मूलभूत गरजा एवढ्याच नागरिकांच्या माफक अपेक्षा असतात़ या समस्यान सोडविणाऱ्या नगरसेवकाला जनता निवडणुकीत आपली ताकद दाखवून देते, याची पुरेपूर जाणीव असल्याने नगरसेवकांची निष्ठा त्यांच्या वॉर्डाप्रतीच असते़ आपली पत आणि ताकदीनुसार प्रत्येक नगरसेवक आपल्या वॉर्डातील कामे मार्गी लावत असतो़ त्यामुळे पालिकेच्या महासभेतील मौनीबाबाही वॉर्डात कार्यसम्राट असू शकतो़ मात्र एका खाजगी संस्थेच्या वार्षिक सर्वेक्षणात प्रभाग समित्यांच्या बैठकीत नगरसेवकांची हजेरी व नागरी प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरण्याचे प्रमाण घटत असल्याची चिंताजनक बाब उजेडात आली आहे़पालिकेचा कारभार हायटेक करण्यासाठी नगरसेवकांना मोबाइल, लॅपटॉप देण्यात आले़ आॅनलाइन नागरी सेवा सुरू करण्यात आली़ मात्र हायटेक पद्धतीने नागरी समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणारे नगरसेवक हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेही नाहीत़ पालिकेच्या महासभांमध्ये अनेक वेळा वादळी चर्चा गेल्या वर्षभरात झाली़ मात्र या चर्चेचे मूळ नागरी समस्या नव्हे, तर राजकीय हेवेदावेच ठरले़ ऐतिहासिक सभागृहाच्या अस्मितेला धक्का देणाऱ्या हाणामारीच्या घटनाही घडल्या़ आॅनलाइन सेवेमुळे विभाग कार्यालयापर्यंतची नागरिकांची पायपीठ टळली़ पण अकार्यक्षम कारभारामुळे गैरसोय मात्र वाढली आहे़ वर्षभरात ३५ टक्केच नागरी समस्या पालिकेने सोडविल्या आहेत़ २४ तास पाणीपुरवठा, वायफाय सेवा, खड्डेमुक्त मुंबईची खुशीची गाजरे दाखविणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीचा प्रशासनावर अकुंश राहिलेले नाही़, हे यावरूनच दिसून येते़ देशाच्या श्रीमंत महापालिकेकडे पायाभूत प्रकल्पांसाठी करोडो रुपये आहेत़ पण हे काम दर्जेदार करून घेण्याची इच्छाशक्ती नाही़ म्हणून कारभार हायटेक झाला तरी दूषित पाणी, कचऱ्याची तक्रार, नाले तुंबणे, खड्डे हे नेहमीचे प्रश्न आजही कायम आहेत़
प्रजेच्या परीक्षेत महापालिका नापास
By admin | Updated: May 4, 2015 03:34 IST