जव्हार : जव्हार, मोखाडा तालुक्यात रविवारी वादळी वार्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या फटक्यात जवळजवळ १५० घरांचे पत्रे, कौले, छप्पर उडून मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यापैकी ७६ पंचनाम्यांची कार्यवाही तहसील कार्यालयामार्फत करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने वनवासी गावात ३५ ते ४० घरांचे नुकसान झालेले आहे. जव्हार तालुक्यातील वनवासी, आपटाळे, चंद्रपूर, गंगापूर, कापरीचापाडा, कौलाळे, न्याहाळे, नांदगांव, पिंपळगांव, इत्यादी गाव पाडयांतील आदिवासी बांधवांच्या घरातील पत्रे, छप्पर वादळी वार्याने उडून मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. जव्हार तालुक्यात प्रथमच एका दिवसांत जवळजवळ १५० घरांचे वादळी वार्यामुळे नुकसान झाल्याची घटना घडली. नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे त्या त्या गावपाड्यातील तलाठ्यांकडून पंचनामे करण्याचे काम मंगळवारी सायंकाळी उशीरा पर्यंत सुरू होते. यात ७६ लोकांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत, अशी माहिती तहसील कार्यालयातून मिळाली. तसेच या सर्व आपत्कालीन योजनेमार्फत नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना शासनाकडून मदत मिळण्याकरिता तहसील कार्यालयामार्फत कार्यवाही केली जाणार आहे. (वार्ताहर)
वादळामुळे १५० घरे उद्ध्वस्त
By admin | Updated: May 21, 2014 05:03 IST