नवी मुंबई : तीन वर्षांत शहरातून ८२३ जण बेपत्ता झाले असून, ३६६ बेवारस मृतदेह सापडले आहेत. पोलिसांच्या प्रयत्नानंतरही या १,१८९ जणांची कसलीही माहिती मिळालेली नाही. त्याकरिता १० जिल्ह्णांतील बेपत्ता व्यक्तींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पोलिसांतर्फे भरवण्यात आले आहे.शहरातून लहान मुले व व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्याही तक्रारी पोलिसांकडे वाढत आहेत. अशा बेपत्ता व अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेऊनही पोलिसांना त्यांचा तपास लागलेला नाही. २०१२ पासून आजतागायत १८ वर्षांखालील १२७ मुले हरवली आहेत. त्यामध्ये ८१ मुलींचा समावेश आहे. तर १८ वर्षांवरील ५९४ बेपत्तांमध्ये ३४३ मुले अथवा पुरुष तर २५१ मुली अथवा महिला आहेत. त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये आहे. हे सर्व जण घरातून अथवा कामानिमित्त घराबाहेर गेले असता बेपत्ता झालेले आहेत. त्याशिवाय १८ वर्षांखालील ४३ व १८ वर्षांवरील ५९ मुले व मुली पळवून नेलेली आहेत. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांचा शोध लागलेला नाही. त्याशिवाय गेल्या तीन वर्षांत ३६६ बेवारस मृतदेह पोलिसांना आढळून आलेले आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांअंतर्गत ठिकठिकाणी अकस्मात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे हे मृतदेह आहेत. मात्र त्यांच्या वारसांचा अद्याप शोध लागलेला नाही. अशा १,१८९ जणांची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी शक्कल लढवली आहे. त्याकरिता नवी मुंबईलगत असलेल्या दहा जिल्ह्णांतील बेपत्ता व्यक्तींचे छायाचित्र प्रदर्शन सीबीडी येथे भरवण्यात आले आहे. २८ व २९ एप्रिल असे दोन दिवस पोलीस आयुक्तालय आवारात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. त्यामध्ये नवी मुंबईबाहेर आढळलेल्या बेवारस व्यक्तींची छायाचित्रेही मांडली जाणार आहेत. (प्रतिनिधी)
बेपत्तांसंदर्भात प्रदर्शन
By admin | Updated: April 27, 2015 04:33 IST