Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात काेराेनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाच्या तुलनेत दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाच्या तुलनेत दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत सोमवारी सर्वांत कमी दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली. मागील दोन महिन्यांचा विचार केल्यास राज्यात दैनंदिन रुग्ण निदानाचे प्रमाण कमी झाले आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेवारीत ९२ हजार १७७ रुग्णांची नोंद झाली. तर डिसेंबरमध्ये ही संख्या १ लाख २० हजार ६६४ आणि नोव्हेंबरमध्ये १ लाख ४३ हजार २६२ इतकी होती. सोमवारी १ हजार ९४८, रविवारी २ हजार ५८५ आणि शनिवारी २ हजार ६३०, २९ जानेवारी रोजी २ हजार ७७१ रुग्णांची नोंद झाली.

राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, राज्यात रुग्ण निदानाचे दैनंदिन प्रमाण ३ हजारांच्या घरात आले आहे. मात्र कोरोना विषाणूचा धोका टळलेला नाही, हा विषाणू स्थिरावला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव म्हणावा तितका कमी झाला नसल्याचे दिसून येत आहे.

* खबरदारी घेणे गरजेचे

डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, राज्यात आता आणखी नव्याने सर्व सेवासुविधा खुल्या होत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत नाहीत. परेदशातील सध्याची कोरोना विषाणूची स्थिती पाहता यातून आपण धडा घेतला पाहिजे, परदेशातही काही देशांत नियम न पाळल्याने पुन्हा बंधने घालावी लागली आहेत. ही स्थिती आपल्यावर येऊ नये यासाठी सामान्यांनी वेळीच खबरदारी बाळगली पाहिजे.

..................