मुंबई: महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील कुर्ला स्थानकाकडे जाणारे वळण बंद केले आहे. मात्र त्याचा फटका आता बेस्ट प्रशासनाला बसला आहे. बुद्ध कॉलनीकडील वळण बंद झाल्याने बेस्टला पुढे जात म्हाडा संकुलाजवळून वळण घेणे भाग पडत आहे. त्यामुळे बेस्टवर दररोज १.७९ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर उपाय म्हणून थेट ४ रुपये भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारान्वये प्राप्त झालेल्या कागदपत्रांतून ही बाब समोर आली. बेस्टचे सहाय्यक आगार व्यवस्थापक अभय शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार हे वळण बंद झाल्याने एकूण १८ बसमार्गांवर परिणाम झाला आहे. दररोज सरासरी १ हजार ४११ बसफेऱ्या येथून होत असून, प्रति बसफेरीमागे १.३ कि.मी. एवढे अंतर वाढले आहे. म्हणजे एकूण १ हजार ८३४.३ किलोमीटरचा प्रवास वाढला आहे. बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांचा प्रति कि.मी. खर्च ९७.७२ रुपये एवढा असून, आता अतिरिक्त १ हजार ८३४.३ कि.मी.साठी १ लाख ७९ हजार २४८ एवढा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
पालिका-वाहतूक पोलिसांचा निर्णय, मात्र फटका बेस्टला
By admin | Updated: July 13, 2015 02:42 IST