कल्याण/कोळसेवाडी : भरघाव वेगाने दुचाकीवरून येणार्या मंगलदास रजत (३५) या युवकाचा वालधुनी ब्रीजवरून रेल्वेमार्गावर पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. रजत यांचा लॉण्ड्रीचा व्यवसाय असून ते कल्याण-कोळसेवाडी परिसरात राहत होते. नेहमीप्रमाणे सकाळी उल्हासनगरकडून येत असताना हा अपघात झाला. दुचाकीचा वेग आटोक्यात न आल्याने पुलावरील एका वळणावर त्यांचा तोल जाऊन ते रेल्वे रुळांवर पडले आणि तेथे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घटनास्थळाला महापौरांची भेट : हा अपघात समजताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन भेट दिली. त्या ठिकाणी आधीही काही अपघात झाल्याचे समजताच त्यांनी उपाययोजना म्हणून संरक्षक जाळी बसवण्यात येईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)
वालधुनी ब्रीजवरून पडून एकाचा मृत्यू
By admin | Updated: May 20, 2014 01:25 IST