मुंबई : काळबादेवी येथील भीषण आगीला इमारतीच्या मीटर बॉक्समधील शॉर्टसर्किटच कारणीभूत असल्याचे उजेडात आले आहे़ परंतु या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे चार वरिष्ठ अधिकारी अडकले कसे? दुर्घटनेचा घटनाक्रम, आग नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी उचललेली पावले, असे अनेक सवाल उपस्थित झाले होते. परंतु तीन आठवड्यांच्या चौकशीनंतर ही एक दुर्दैवी घटनाच होती, यामध्ये कोणाची हलगर्जी कारणीभूत नाही, असा निष्कर्ष पालिकेच्या चौकशी समितीने काढल्याचे सूत्रांकडून समजते़ हा अहवाल लवकरच आयुक्तांना सादर होणार आहे़९ मे रोजी काळबादेवी येथील चार मजली गोकूळ निवास आगीच्या भक्ष्यस्थानी पडली़ या आगीत अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर, उपप्रमुख अधिकारी सुधीर अमीन, साहाय्यक विभागीय अधिकारी संजय राणे आणि भायखळ्याचे केंद्र अधिकारी महेंद्र देसाई शहीद झाले़ या भीषण दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सात सदस्यीय समितीची नियुक्ती केली़ त्यानुसार तीन आठवड्यांत ही समिती अहवाल सादर करणार आहे़ या समितीच्या सदस्यांनी बुधवारी घटनास्थळाची पाहणी केली़ दुर्घटनेवेळीचे बचावकार्य, त्यात अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि रुग्णवाहिकांच्या मार्गात आलेला अडथळा याचा बारकाईने अभ्यास करण्यात येत आहे़ तसेच इमारत धोकादायक असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जीव धोक्यात का घातला? या प्रश्नांचे उत्तर ही समिती शोधत होती़ मात्र चौकशीअंती या दुर्घटनेला कोणालाही जबाबदार न धरता ही एक दुर्दैवी घटनाच असल्याच्या निष्कर्षावर ही समिती आली, असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते़ (प्रतिनिधी)अधिकारी अडकले कसे?नियमांनुसार आगीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढल्यानंतर इमारत धोकादायक असल्यास बचावकार्यासाठी अधिकाऱ्यांना आतमध्ये प्रवेश करण्याची गरज नाही़ मात्र पीडितांना बाहेर काढल्यानंतर अग्निशमन दलाचे चार वरिष्ठ अधिकारी इमारतीमध्ये गेले का, असा सवाल उपस्थित केला जात होता़ ही इमारत कोसळून ढिगाराही उपसला गेल्यामुळे घटनेचा क्रम सांगण्यासाठी कोणताच पुरावा नाही़ त्यामुळे प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी या धोकादायक इमारतीचे बाहेरूनच निरीक्षण करीत पुढील व्यूहरचना आखत असतानाच कोसळणाऱ्या इमारतीच्या तडाख्यात आले.
हलगर्जी नव्हे तर दुर्घटनेतच मृत्यू
By admin | Updated: May 30, 2015 00:28 IST