Join us
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या निकालावर आक्षेप नोंदवण्यासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:07 IST

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना ...

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालावर काही आक्षेप/तक्रारी असतील तर त्या संबंधितांनी विहित केलेल्या नमुन्यात (प्रपत्र -अ)मध्ये अर्ज करण्याबाबत कळवले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

२५ सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याबाबत सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत व अन्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा २०२१ च्या मूल्यमापनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २४ जून २०२१ रोजी निकाल दिला आहे. त्यानुसार परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर झाल्यानंतर या निकालावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्याच्या निराकरणासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबत आदेश देण्यात आला आहे.