Join us  

... तर आणखी पाच वर्षे कोस्टल रोड झाला नसता; देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 9:40 AM

मला भूमिपूजनालाही बोलावले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेत नाही, आम्ही जे करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडच्या प्रारंभप्रसंगी आमदार आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. 

तर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात कोस्टल रोडच्या कामात आलेल्या अडथळ्यांची शर्यत सांगत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे मुख्यमंत्री असल्याने कोस्टलच्या कामाला सुरुवात होऊन आज एक मार्गिका खुली होत आहे. मात्र, आधीचे सरकार असते तर पुढच्या पाच वर्षांतही हे काम झाले नसते, अशी टीका फडणवीस यांनी केली.

कोस्टल रोडची संकल्पना फार वर्षांपूर्वीची असून, उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या दोन निवडणुका कोस्टल रोडचे प्रेझेंटेशन दाखवूनच पार पाडल्या. कोस्टल रोड कधी झालाच नाही असे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कोस्टल रोडच्या कामाला लागलेला विलंब का झाला यायची माहिती दिली. सन २००४ ते २०१४ मध्ये राज्यात आणि केंद्रात यूपीएचे ीिएचे सरकार होते. दरम्यान, रिक्लेमेशन न करू देण्याबाबत केंद्र सरकार ठाम होते. युपीएमधील शेवटचे मुख्यमंत्रीही दिल्लीला जायचे आणि हात हालवत यायचे असे फडणवीसनी सांगितले. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली दरबारी आपण प्रयत्न केल्याचे फडणवीसांनी अनेक उदाहरणासह सांगितले.

मला भूमिपूजनालाही बोलावले नाही

सगळ्या परवानग्या मिळवल्यानंतर आणि राज्याचा मुख्यमंत्री असूनही कोस्टलच्या भूमिपूजनाला मला बोलावले नाही. भूमिपूजन रातोरात करायचे ठरवण्यात आले, अशी खंत देवेंद्र फडणवीसानी बोलून दाखवली. श्रेयाकरिता आम्ही कधीच लढलो नाही, कारण मी मुख्यमंत्री होतो, मी भूमिपूजन रोखू शकलो असतो, आयुक्तांना ते सांगू शकलो असतो. पण, आम्हाला मुंबईचा विकास हवाय, आमच्यापेक्षा मुंबई मोठी आहे, आमच्या श्रेयापेक्षा मुंबई मोठी आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण करू शकलोय, त्यामुळे मुंबईकर जन्मभर आपले नाव घेणार आहेत. त्यामुळे, कोत्या मनाची लोक काय असतात आणि मोठ्या मनाची लोक काय असतात हे निश्चितपणे आपल्याला यातून लक्षात येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी म्हटले, कोस्टलचे अनेक कंत्राटदार आमच्याकडून नाहक वसुली केली जात आहे अशा तक्रारी घेऊन यायचे, आत वसुर्ली कोण करत होते हे सांगायची गरज नाही, त्यांच्यामुळे कोस्टल रोडचे काम राखडल्याची टीका फडणवीस यांनी केली.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीस