Join us

डीसी-एसी परावर्तनाचा फटका

By admin | Updated: June 19, 2015 01:44 IST

मध्य रेल्वेवर डीसी-एसी परावर्तनाचे काम दहा दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले. मात्र या परावर्तनानंतर लोकल सेवांचा चांगलाच बोऱ्या वाजण्यास सुरुवात झाली

मुंबई : मध्य रेल्वेवर डीसी-एसी परावर्तनाचे काम दहा दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले. मात्र या परावर्तनानंतर लोकल सेवांचा चांगलाच बोऱ्या वाजण्यास सुरुवात झाली आणि दिवसभर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या परावर्तनानंतर साधारण आठ दिवस मेन लाइन रुळावर येण्यास लागतील, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते. परंतु दहा दिवस उलटल्यानंतरही मेन लाइन रुळावर येत नसून आणखी पंधरा दिवस त्यासाठी लागणार असल्याचे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले. सीएसटी ते ठाणेपर्यंत डीसी (१,५00 डायरेक्ट करंट) ते एसी (२५000 अल्टरनेट करंट) परावर्तनाचे काम ७ जूनच्या मध्यरात्री पूर्ण करण्यात आले. या परावर्तनामुळे लोकलचा वेग ताशी ८0 किमीवरून ताशी १00 किमीपर्यंत नेण्यास शक्य होणार असून मोठ्या प्रमाणात वीज बचतही होईल. मात्र हे परावर्तन होताच लोकल गाड्यांना लेटमार्क लागण्यास सुरुवात झाली आणि त्याचा फटका प्रवाशांना बसू लागला. एसी परावर्तन आणि लोकल यांच्यातील ताळमेळ जमण्यास थोडा वेळ जाणार असून साधारण आठ दिवस मध्य रेल्वेची मेन लाइन रुळावर येण्यास लागतील, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांनी आठ दिवस लेटमार्कचा मनस्ताप सहन केला. परंतु त्यानंतरही मेन लाइनवरील लेटमार्कचे चित्र बदललेले नसून ते बदलण्यास मध्य रेल्वे प्रशासनाला अपयश आले आहे. परावर्तनानंतर सुरुवातीला जवळपास ४00 ते ५00 लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत होता. अजूनही तेवढ्याच प्रमाणात लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत असल्याचे सांगितले जात आहे. याविषयी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांना विचारले असता, परावर्तनानंतर रेल्वे रुळावर येण्यास थोडा वेळ लागत आहे ही खरी बाब आहे. आमच्याकडून सेवा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून आणखी पंधरा दिवस त्यासाठी लागतील. आता ३५0 ते ४00 लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. परावर्तन झाल्यानंतर त्यापुढील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी साधारपणे आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्याचा लोकल सेवांशी काही संबंध नसला तरी परावर्तनाशी संबंधित कामांसाठी पंधरा दिवस लागणार असल्याचे सूद यांनी सांगितले.