Join us

खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण!

By admin | Updated: August 22, 2015 22:48 IST

डोंबिवली शहराच्या पश्चिमेकडील भागात दाट वस्तीत असलेल्या श्रीधर म्हात्रेवाडीसह असंख्य वाहनचालकांना कोपर दिशेकडील उड्डाणपुलाएवढेच ठाकुर्लीच्या रेल्वे फाटकाचे महत्त्व आहे.

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीडोंबिवली शहराच्या पश्चिमेकडील भागात दाट वस्तीत असलेल्या श्रीधर म्हात्रेवाडीसह असंख्य वाहनचालकांना कोपर दिशेकडील उड्डाणपुलाएवढेच ठाकुर्लीच्या रेल्वे फाटकाचे महत्त्व आहे. मात्र, बावनचाळीच्या परिसरातील खड्ड्यांमुळे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि खासदार निधी वेळेत मिळत नसल्याने या ठिकाणच्या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यातच रेल्वेच्या वसाहतींमध्ये सध्या कोणीही वास्तव्यास नसल्याने तेथे अनैतिक धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. याबाबत, वेळोवेळी पोलीस प्रशासनाला सांगण्यात येते, मात्र तरीही त्यावर फारसा अटकाव झालेला नाही, ही शोकांतिका आहे. महापालिकेचा ६४ क्रमांकाचा वॉर्ड हा बावनचाळ नावानेच ओळखला जातो. साधारणत: २० हजारांची वस्ती असलेल्या या वॉर्डात काही धोकादायक इमारती असून काही अतिधोकादायक आहेत. मात्र, येथेही मालक-भाडेकरू यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने अनेक ठिकाणच्या इमारतींचा प्रश्न जैसे थे आहे. त्यासाठी काही ठिकाणी नगरसेवकांनी स्वत: मध्यस्थी करून तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. स्वच्छतेच्या दृष्टीनेही काही ठिकाणचा अपवाद वगळल्यास कचरा दिसून येत नाही, परंतु तरीही डासांचे प्रमाण अधिक असल्याने नागरिक त्रस्त आहेत. संध्याकाळच्या वेळेत धूरफवारणी करण्यात येत असली तरीही ती यंत्रणा तोकडी असल्याचे सांगण्यात आले. रोझ गार्डनव्यतिरिक्त वॉर्डात मनोरंजनाच्या ठिकाणांचा अभाव असल्याचे दिसून येते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पश्चिमेकडे फारशा संधी नसल्याने विद्यार्थ्यांना पूर्वेकडेच यावे लागते. अन्यथा मुंबई, कसारा-कर्जत आणि नवी मुंबईला जावे लागते. पाण्याची नवीन टाकी बांधण्यात आली, त्यामुळे या ठिकाणी भेडसावणारी पाण्याची समस्या आता संपुष्टात आल्याचा दावा करण्यात येत आहे. केडीएमटीची बससेवा या ठिकाणी उपलब्ध नाही. अंतर्गत रस्त्यांवर ती येऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांना रिक्षांसह अन्य सुविधांवरच अवलंबून राहावे लागते. खेळासाठी हाकेच्या अंतरावर असलेले भागशाळा आणि रेल्वे ग्राउंड उपलब्ध असले तरीही रेल्वे ग्राउंडचा परिसर एका टोकाला येत असल्याने त्या ठिकाणी मुले सुटीव्यतिरिक्त सर्रासपणे खेळायला जाणे टाळतात, असे दिसून आले. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असून रेल्वे स्थानक परिसरात जावे लागते. सकाळच्या वेळेत ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी ठाकुर्लीच्या बावनचाळीत जातात. पहाटेच्या वेळेत रेल्वे हद्दीतील जागेत दिव्यांचा अभाव असल्याने तेथे पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. तसेच त्या परिसरातील रस्त्यांलगत खड्डे, त्या बाजूला कचरा दिसून येतो. जी नवी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे, त्या ठिकाणी सुरक्षारक्षकाचा अभाव असल्यानेही समस्या आहे. पाणी भरल्यानंतर ओव्हरफ्लो होत असते. त्या ठिकाणी अन्य कोणताही उपद्रव होऊ नये, यासाठीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पाण्याच्या टाकीला तीन पाळ्यांमध्ये सुरक्षारक्षक देण्यात यावा, यासाठी महापालिकेकडे मागणी केली आहे. या ठिकाणच्या स्मशानभूमीसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात येत आहे. त्यासाठी खासदार निधीसाठीही पाठपुरावा करण्यात येत आहे. रोझ गार्डन ही शोभा आहे, अन्य समस्या परिसरात नाहीत.- जनार्दन म्हात्रे, नगरसेवक