डहाणू : डहाणू नगरपरिषद हद्दीतील असंख्य प्रभाग तसेच अनेक मुख्य रस्त्यावरील कचरा रोजच्या रोज उचलला जात नसल्याने शिवाय शहरातील मुख्य रस्त्यालगतचे गटार कचऱ्याने व प्लास्टीकने तुडूंब भरले आहेत. मात्र त्याची वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने नागरीक त्रस्त झाले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याबाबत तक्रार करूनही पालिकेचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.डहाणू नगरपरिषद क्षेत्रातील निर्माण होणारा घनकचरा प्रत्येक घरी घंटागाडीद्वारे संकलित केले जाते. तर शहरातील बाजारपेठ व अनेक प्रभागातील रस्ते पालिकेच्या कर्मचाऱ्यामार्फत साफसफाई केले जाते. डहाणू नगरपालिका हद्दीत दररोज सुमारे दहा टन कचरा जमा होते. त्या घनकचऱ्याची वाहतुक व विल्हेवाट लावण्यासाठी तसेच पालिकाहद्दीत स्वच्छता ठेवण्यासाठी पालिकेला दरमहा दहा लाख पेक्ष अधिक रक्कम मोजावी लागते. परंतु लाखो रू. खर्च होऊनही नगरपरिषद प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पालिका हद्दीतील स्टेशन परिसर, थर्मलपावर रोड, इराणी रोड, भेलगल्ली, लोणीपाडा, दामुपाडा, प्रभुपाडा, चिमणीपाडा, संजय नगर, आंबेमोरा, इ. परिसरात घाणीचे साम्राज्यात येथील लोक जीवन जगत आहेत.
डहाणूत घाणीचे साम्राज्य वाढले
By admin | Updated: September 8, 2014 00:27 IST