Join us  

अरबी समुद्रात हिक्का नावाचे चक्रीवादळ, मुंबईला धोका नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 7:39 PM

२६ सप्टेंबर रोजी मुंबईसह कोकण आणि गोव्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतरण आता चक्रीवादळात झाले आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने चक्रीवादळास हिक्का हे नाव दिले आहे. हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकले असून, मुंबईला चक्रीवादळाचा धोका नाही. मात्र, किंचित परिणाम म्हणून गुजरातमध्ये मध्यम तर कोकण आणि गोवा येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

२६ सप्टेंबर रोजी मुंबईसह कोकण आणि गोव्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी मुंबईत मध्यम सरी बरसतील आणि त्यामुळे काही सखल भागात पाणी साचू शकेल. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरातमध्ये पावसाळी गतिविधी सुरु होत्या. गेल्या २४ तासांत गुजरातमधील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस नोंदला गेला. पूर्वेकडील वडोदरा येथे १२.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर पोरबंदर आणि वेरावळमध्ये अनुक्रमे ११ मिमी आणि ५.४ मिमी पाऊस पडला. येत्या २४ ते ४८ तासांत गुजरातच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात एक- दोन मध्यम सरींसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- बंगालच्या उपसागरात एक मान्सून प्रणाली तयार होईल. हे कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण द्वीपकल्पाकडे सरकेल. ज्यामुळे आठवड्याच्या पूर्वार्धात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये पावसाची अपेक्षा आहे. केरळवासियांना या आठवड्यात काही तीव्र सरींचा अनुभव येईल. या भागांतील पावसाचा जोर लवकरच कमी होईल.

- ईशान्य आणि पूर्वेकडील अरबी समुद्रात असलेले चक्रीवादळ हिक्का आणखीन पुढे सरकण्याची शक्यता आहे. म्हणून, त्याचा प्रभाव नगण्य असेल. तथापि, २५ सप्टेंबरच्या सुमारास दक्षिण गुजरातमध्ये आणखी एक चक्रवाती प्रणाली तयार होणे अपेक्षित आहे.

- गुजरात आणि लगतच्या भागात २६ किंवा २७ सप्टेंबरच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मध्यम पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी एक दोन जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. याकाळात, सौराष्ट्र आणि कच्छ परिसरामध्ये पावसाळी गतिविधी पुनरुज्जीवीत होतील. आतापर्यंत कमकुवत पावसाळी गतिविधी राहिलेल्या कच्छमध्ये देखील मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- मेहसाणा, पाटण, इदार, साबरकांठा, बनसकांठा, भुज, नलिया, जामनगर, कांडला, द्वारका, ओखा अशा ठिकाणी २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- पावसाच्या पार्श्वभूमीवर, गुजरातसह सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये आधीच असलेले अनुक्रमे २५ आणि ४४ टक्के असलेले पावसाचे आधिक्य अजून वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :मुंबई