Join us  

सायकलवरून २९ राज्यांत भ्रमंती करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 4:38 AM

दोन हजार रुपये घेऊन प्रवास : बालकांचे लैंगिक शोषण यावर जनजागृती

मुंबई : पर्यावरणाची होणारी हानी, तापमान वाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या बालविवाह प्रतिबंध, बालकांचे लैंगिक शोषण या विषयावर जनजागृती करण्यासाठी, पश्चिम बंगाल येथील पुरुलियाहून देश भ्रमण करणारा अक्षय भगत या २२ वर्षीय तरुणाने १६ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. अजून काही राज्यांमध्ये अक्षय प्रवास करून जनजागृती करणार आहे. तो मुंबईत पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांच्याकडे थांबला होता. आता तो गेटवे आॅफ इंडिया येथे थांबला आहे.

अक्षयने आतापर्यंत पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरातहून महाराष्ट्र असा प्रवास केला आहे. दोन दिवस मुंबईमध्ये राहून तो पुढे गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आंध्र प्रदेश आदी राज्यात प्रवास करणार आहे. आतापर्यंत १५ राज्य भ्रमंती करून एकूण २९ राज्य सायकलने भ्रमंती करत फिरणार आहे. ५ मार्च, २०१८ रोजी पश्चिम बंगाल येथून सायकलवर प्रबोधनात्मक फलक लावून, घरातून अवघे दोन हजार रुपये घेऊन भारतभर भ्रमंती करायला सुरुवात केली. तीन हजार रुपयांची सायकल घेऊन तो समाजप्रबोधन करीत फिरत असताना, दिल्लीला पोहोचल्यावर तेथील वकील सिद्धार्थ नायक यांनी २५ हजारांची सायकल बक्षीस दिली. खिशात फक्त दोन हजार रुपये घेऊन सायकलने प्रवासाला निघालेल्या अक्षयला मात्र ठिकठिकाणी नागरिकांनी राहण्याची, जेवणाची मदत केली. तो विविध राज्यांतील मंदिरे, धर्मशाळा, पदपथावर मुक्काम करतो. मुंबईत त्याने एका वकिलाच्या घरी मुक्काम केला होता. तो दररोज ८० किलोमीटरचा प्रवास करतो.मी लहान मुलांची शिकवणी घेतो. माझ्या घरातून बालविवाह प्रथा पाहिलेली आहे. ही समस्या खेड्यापाड्यात अनेक ठिकाणी सुरू आहे. यावर आवाज उठवून समाजात जनजागृती करण्याचा विचार मनात आला. प्रवासाला सुरुवात करताना अनेक लोकांनी मदत केली. प्रवास करताना आपल्या देशाचे भयानक चित्र दिसले. पर्यावरण वाचविणे आपली जबाबदारी आहे.- अक्षय भगत, सायकलस्वार आणि पर्यावरणप्रेमी.

टॅग्स :मुंबई