नवी मुंबई : सायबर क्राईम हेच भविष्यातले गुन्हे असतील. शेजारी देशांकडून तसेच हॅकर्सकडून होणाऱ्या अशा कारवायांना सामोरे जाण्याची ताकद निर्माण करण्याची गरजही निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी व्यक्त केली. नवी मुंबई पोलीस आयोजित सायबर सुरक्षा सप्ताहाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी ते नेरूळ येथे बोलत होते.सायबर गुन्ह्यांनी पोलिसदलापुढे आव्हान उभे केले आहे. देशाबाहेरील हॅकर्सच्या संघटनांबरोबरच एखाद्या व्यक्तीकडून देखील असे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे येणारा काळ हा सायबर गुन्ह्यांचा असल्याची चिंता शिवानंदन यांनी व्यक्त केली. अशा गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी पोलिसांनीही अद्ययावत होण्याची गरज आहे. त्याकरिता सरकारने ठोस पाऊल उचलणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. आजतागायत जिवाची भीती दाखवून खंडणीचे प्रकार घडत होते. येत्या काळात मात्र व्यक्तीची गुप्त माहिती चोरून (हॅक) खंडणीसाठी धमकावले जाऊ शकते. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान देखील गुन्हेगारांकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे सायबर गुन्हे हेच भविष्यातील गुन्हे असतील, असेही त्यांनी सांगितले. अॅड. वैशाली भागवत यांनी सोशल मीडिया वापरताना घ्यायच्या खबरदारीबाबत मुलांना मार्गदर्शन केले. सध्या ६० टक्के अल्पवयीन मुले ही आॅनलाइनवर अश्लीलतेला बळी पडत असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांच्या वतीने आयोजित सायबर सुरक्षा सप्ताहाची सांगता सोमवारी नेरूळच्या डी. वाय. पाटील सभागृहात झाली. याप्रसंगी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद, अप्पर पोलीस आयुक्त फत्तेसिंह पाटील, उपआयुक्त सुरेश मेंगडे, नेरूळच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे अल्फांसो यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी आयोजित चित्रकला स्पर्धेत शालेय गटातून तुषार सुतारने तर महाविद्यालयीन गटातून प्रियांका चौधरीने प्रथम क्रमांक मिळवला. (प्रतिनिधी)
सायबर गुन्हे हेच भविष्यातील आव्हान
By admin | Updated: December 23, 2014 01:38 IST