वसई : वसई-विरार परिसरात बनावट मिनरल वॉटरचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मध्यंतरी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. मात्र, ती थंडावताच या उत्पादकांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कोणतीही शु्द्धता नसलेल्या या बाटलीमधील पाणी २० ते ३० रुपये दराने विकले जाते. यामुळे ते शरीराला अपायकारक आहे. अधिकाऱ्यांनी या सर्व प्लँटची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गापलीकडे पेल्हार व अन्य गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू आहे. विशेष म्हणजे, या कंपन्यांकडे अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात येणारे प्रमाणपत्रही नाही. वसई-विरार उपप्रदेशाच्या बाजारामध्ये अशा बोगस कंपन्यांचा ३० टक्के वाटा आहे. अनेक हॉटेलमध्ये या बाटल्या सर्रास विकल्या जातात. बोगस असलेल्या कंपन्यांकडून कमी किमतीत पाणी बाजारात उपलब्ध होत असल्याने भेळपुरीची विक्री करणारे तसेच मिठाई व्यावसायिक ते खरेदी करतात. पाणीपुरीतील पाण्यासाठी आम्ही मिनरल वॉटर वापरतो, अशी शेखीही मिरवतात. या बाटल्यांवर आयएसआय मार्कही नसतो. त्यामुळे हे प्लँट बंद करण्याची मागणी होत आहे.
पाणी कंपनीकडून ग्राहकांची दिशाभूल
By admin | Updated: May 9, 2015 22:57 IST