Join us

दुर्घटनांचे चौकशी अहवाल गुलदस्त्यातच

By admin | Updated: June 7, 2015 01:59 IST

अग्निशमन दलातील चार अधिकाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या काळबादेवी येथील आगीच्या चौकशीचा अहवाल

मुंबई : अग्निशमन दलातील चार अधिकाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या काळबादेवी येथील आगीच्या चौकशीचा अहवाल ठरलेल्या मुदतीनुसार तीन आठवड्यांत सादर झाला़ परंतु अशा काही मोठ्या दुर्घटनांच्या चौकशीचे अहवाल गेली अनेक वर्षे गुलदस्त्यातच आहेत़ या दिरंगाईमुळे दुर्घटनेबाबत चौकशी करण्याच्या पालिका प्रशासनाच्या इच्छाशक्तीवरच संशय व्यक्त होऊ लागला आहे़जुलै २०१४मध्ये अंधेरी येथील लोटस् बिझनेस पार्क या इमारतीला भीषण आग लागली होती़ या आगीत अग्निशमन दलाचे जवानच अडकून पडले व एका जवानाचा मृत्यू झाला़ परंतु या दुर्घटनेची चौकशी करणारे अतिरिक्त आयुक्त निवृत्त झाल्यामुळे दुसऱ्या अधिकाऱ्याकडे चौकशीची सूत्रे सोपविण्यात आली़ त्यामुळे या दुर्घटनेचा नव्याने शोध घ्यावा लागला़ मात्र ही चौकशी आता पूर्ण झाल्याचे सूत्रांकडून समजते़ हा अहवाल पुढील पंधरवड्यात सादर होण्याची शक्यता आहे़ सप्टेंबर २०१३मध्ये डॉकयार्ड येथील बाबू गेनू मंडईची इमारत कोसळून ६१ जण मृत्युमुखी पडले होते़ या दुर्घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होते़ या प्रकरणात बाजार खात्याच्या अभियंत्यांचे निलंबन व अटकही झाली़ या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव रखडण्यास वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचेही सांगण्यात येत होते़ परंतु या अहवालाची प्रत कधी सादर झालीच नाही, अशी नाराजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी व्यक्त केली आहे़ (प्रतिनिधी)कसा दिलासा द्यायचा हा प्रश्नचसप्टेंबर २०१३ : डॉकयार्ड येथील बाबू गेनू मंडईची इमारत कोसळून ६१ जणांचा मृत्यू झाला़ या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली़ या वसाहतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पालिकेचे वरिष्ठ अधिकारीच अडकण्याची शक्यता होती़ परंतु या प्रकरणात अभियंता निलंबित झाले व बडे अधिकारी मात्र बढती मिळवून मंत्रालयात पोहोचले़जुलै २०१४ : अंधेरी येथील लोटस् बिझनेस पार्क या इमारतीमध्ये लागलेल्या भीषण आगीत बचावकार्यादरम्यान पालिकेचे जवानच अडकून पडले़ या जवानांना वाचविण्यासाठी नागरी संरक्षण दलाची मदत घ्यावी लागली़ तरीही या दुर्घटनेत एका जवानाचा मृत्यू झाला़ या दुर्घटनेवेळी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याप्रकरणी तत्कालीन प्रमुख अधिकारी ए़ वर्मा यांचे डिमोशन केले़ मात्र या दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही़मे २०१५ : काळबादेवी येथील गोकूळ निवास या चार मजली इमारतीला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे चार प्रमुख अधिकारी मृत्युमुखी पडले़ या दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल तीन आठवड्यांत सादर झाला़ मोठ्या दुर्घटनांवेळी इन्सिडेंट कमांडरची नियुक्ती, अग्निशमन दलात वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचे वेळोवेळी मूल्यमापन, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त सैनिकी अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण, शहरात व उपनगरांमध्ये अरुंद व वर्दळीच्या ठिकाणी छोटी-छोटी अग्निशमन केंद्रे, सहा कमांडिंग सेंटर्स कार्यान्वित करणे, २६ अग्निशमन केंद्रे सुरू करण्याचा कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याचा पाठपुरावा करणे अशा शिफारशी केल्या आहेत़